‘‘बाप होणं म्हणजे पुरुषपण सिद्ध होणं असं मला वाटत नाही. मला माझ्या या अनुभवातून माणूस होता आलं, हे महत्त्वाचं. आपण ‘डायरेक्टर’ असावं, ‘डिक्टेटर’ नाही हा पहिला धडा आमच्या बाप-लेकीच्या नात्यात आम्ही जपला. म्हणूनच आमच्या घरात दु:ख, चिडचिड, मानसिक कोंडी आणि राग व्यक्त करायची मोकळीक आहे. वादविवाद, चर्चा आणि थेट प्रश्नोत्तरं यांना आमच्या घरात अग्रस्थान आहे. त्यातूनच आमची मुलगी पर्ण समाजातील जबाबदार व्यक्ती झाल्याचं जाणवतं, त्यामुळे छान वाटतं.’’ उद्याच्या (१५ जून) ‘फादर्स डे’निमित्ताने पर्णच्या ‘रमलेल्या बाबा’ची गोष्ट सांगताहेत, रंगकर्मी अतुल पेठे.

वर्षभरात प्रत्येक दिवस काहीना काही कारणानं साजरा होतो. माणूस प्राणी फार हुशार आहे. जर गंमत केली नाही, हसून पाहिलं नाही तर आयुष्य कंटाळवाणं आणि निरस होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून सण, समारंभ आणि वेगवेगळ्या प्रकारे उत्सव करायचे. उद्या Father’ s Day. म्हणजे समस्त बाबांचा कौतुक दिवस. त्यामुळे या वृत्तपत्राच्या सांगण्यावरून मी माझ्या बाबापणाचा अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मला आणि रोहिणीला एक मुलगी. पर्ण हे तिचं नाव आमचे मित्र लेखक श्याम मनोहर यांच्या त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या ‘कळ’ या कादंबरीतील नायिकेचं होतं म्हणून ठेवलं. लेखकाचा आणि साहित्याचा सन्मान आम्ही असा केला. मात्र ते स्त्रीलिंगी नसून नपुसकलिंगी असल्याबद्दल आम्हाला विचारलं गेलं, पण आम्ही त्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं. नावावरून काही छान विनोदही झाले. उदाहरणार्थ, पर्णला कडेवर घेतलं तर ‘उपर्ण’, कडेवरून खाली ठेवलं तर ‘निष्पर्ण’ किंवा घराचं नाव ‘पर्णकुटी’ वगैरे. खूप मजा यायची.

आजच्या हिशेबात मी त्या वेळी फार लवकर म्हणजे २४ व्या वर्षी लग्न केलं आणि बाबाही नंतर दोन वर्षात झालो. या सुरुवातीच्या काळात माझी अवस्था फार अवघड होती. शिक्षण आणि नोकरीत मला काडीचाही रस नव्हता. जगायला आधार फक्त नाटकाचा होता. त्यातही पैसे आणि प्रसिद्धी नसणारं प्रायोगिक नाटक हेच मला प्रिय होतं. माझ्या आयुष्याचा हेतू काहीही करून जगायचं आहे इतकाच होता. भव्य स्वप्नं वगैरे काहीही पडत नव्हती. माझ्या आईवडिलांनाच माझी चिंता होती. पुत्र, पती आणि पिता म्हणून मी बिलकुल आदर्श नव्हतो. पर्णच्या जन्मानंतर आता आपण बाबा झालो आहोत म्हणून, लाजेकाजेस्तव शिक्षण पूर्ण केलं आणि नाशिकला नोकरी केली.

मला कधी मुलाखतीत लोक माझ्या (त्यांच्या मते यशस्वी) आयुष्याबद्दल विचारतात तेव्हा समोर बसलेल्या मुलांना मी माझं तिरपागडं आयुष्य सांगतो. माझ्यामुळे निदान काही मुलांना धीर येत असावा. थोडक्यात, माझ्या भरकटलेल्या जहाजाला सावरण्याचं काम रोहिणीनं केलं आणि पर्णमुळे मला ते परत समुद्रात नेण्याची ताकद मिळाली.

आज अनेक लोकांना आईबाबा होणं आणि मुलामुलींची जबाबदारी घेणं खूप अवघड वाटतं. अर्थात आजच्या काळातील गुंतागुंतीचे जटिल प्रश्न त्याला कारणीभूत आहेत. पण तसे ते प्रत्येक काळात असतात की. आपल्याला गंमत वाटणाऱ्या गोष्टीचा बाऊ कशाला करायचा, हा प्रश्न आम्हाला कायम पडतो. नाटकात खूप कष्ट आणि असुरक्षितता आहे असं लोक म्हणताना या आव्हानात्मक गोष्टींमुळेच आम्हाला मजा येते हे सांगावं लागतं. तसं तर प्रत्येकाचं आयुष्य म्हटलं तर कठीणच आहे. पण स्वत:हून स्वीकारलेल्या कामात वा जबाबदारीत आनंद असेल तर कठीण रस्ता हसतखेळत सरतो. निदान मला तरी बाप म्हणून जगताना अनाठायी चिंता आणि भविष्याची भीती स्पर्शही करत नाही. अनपेक्षित असं काहीही घडू शकतं तेव्हा आपण कौशल्यपूर्ण तयारीत असावं हे नाट्यप्रयोगाचं सूत्र आम्ही जगतानाही अमलात आणतो इतकंच.

पर्णच्या जन्मावेळी मी चक्क एका कारखान्यात छोटी नोकरी करायचो. तिथं कर्णकटू ठाकाठोक सुरू असताना कोपऱ्यात मी नाटकांचं वाचन करायचो किंवा पाठांतर करायचो. तिथल्याही लोकांना हे कोकरू चुकून इकडं आलंय याची जाणीव होती. त्या कामगारांना मधल्या सुट्टीत मी नकला करून हसवायचो. पर्णच्या जन्मानंतर मी (आयती संधी मिळाली म्हणून) मुलीकडं लक्ष द्यायचं हे कारण पुढं करून ही नोकरी सोडली आणि कुटुंबासह पर्णचं दुसऱ्या दिवसांपासून पालनपोषण करण्यात पुढाकार घेऊ लागलो. मी अचानक काळजी घेणारा बाबा झालो. इतकी काळजी की, कोणी तिचा पापा घेतला तरी मी नाजूक ओल्या कापडानं तिचा गाल पुसायचो. ती झोपली असेल आणि कोणी हॉर्न वाजवला तर लोकांना झापायचो. त्रास नको म्हणून घरातील बेल काढूनच टाकली. आजूबाजूचं जग किती आवाज करते याचं ‘अति भान’ मला त्या काळात आलं होतं. तिच्या वाढीबरोबर आम्हीही वाढत गेलो. पुढं हे ‘अति भान’ कमी झालं. परीक्षा, गुण, स्पर्धा, संस्कार शिबिरं, निपुणता, शिस्तीचे बडगे, उपदेश या असल्या भंपक गोष्टी आमच्यापासून दूर होत्या. त्यापेक्षा गड-किल्ले हिंडणं, सायकल-स्कूटरवरून रपेट मारणं, संग्रहालयं पाहणं, गाणी म्हणणं, नाटकं करणं, पुस्तकं वाचणं, मजेदार बोलून-वागून हसणं याच गोष्टीत आम्हाला रस होता. एकदा तर माथेरानला जाताना आम्ही तिघं कर्जतच्या बटाटेवड्यात इतके रमलो की माथेरानची गाडी डोळ्यासमोरून गेली आणि स्टेशन कधी सामसूम झालं हे आमच्या गावीही नव्हतं.

मी त्या काळात कोल्हापूरच्या लीलाताई पाटील, लेखक अनिल अवचट आणि छायाचित्रकार देविदास बागूल यांचे सुजाण पालकत्वावरील विचार वाचले होते. ‘प्रत्येक लहान मूल हे मोठा माणूस असते.’ हे लीलाताईंचं वाक्य माझ्या मनात घर करून बसलं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पर्णचा विचार असे. आमच्या घराची पाटीही ‘पर्ण रोहिणी अतुल पेठे’ अशी होती. ती पाहून अनेक लोक स्तिमित व्हायचे. काहींनी त्यांच्या घरावरील पाट्या तशा केल्या. आमच्या घरात कोणतेही धार्मिक विधी झालेले नाहीत. बारसं, वास्तुशांत, सत्यनारायण यांच्यापेक्षा नाटक, चित्रकला, नृत्य, संगीत, वाङ्मय या क्षेत्रांतील लोक आमच्या घरी वारंवार येतात. ‘साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ असं वागत वर्षभर उत्सव असतो. या उत्सवात कोणत्याही उधळपट्टीला थारा नसतो. पर्ण आणि आलोकच्या नोंदणी लग्नात आम्ही दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या ‘आसक्त’ आणि ‘नाटक कंपनी’ला आर्थिक देणगी दिली. मग आनंदानं नाचलो आणि हसतखेळत जेवलो.

आमच्या घरात दु:ख, चिडचिड, अस्वस्थता, मानसिक कोंडी आणि राग बोलून व्यक्त करायची मोकळीक आहे. प्रत्येक मुद्द्यावर वादविवाद, चर्चा आणि थेट प्रश्नोत्तरं यांना आमच्या घरात अग्रस्थान आहे. नशीब आणि भांडण-लढाईपेक्षा संवादावर आमचा ठाम विश्वास आहे. आयुष्याबद्दलचे निर्णय घ्यायला पर्ण कायम स्वतंत्र होती. काही न पटणारे एकमेकांचे विचार, स्वभाव आणि कृतीही एकमेकांनी मान्य केल्या आहेत. ‘मुलगी म्हणून समाजात काही बंधनं असतात’ या असल्या नियमांना आमच्या घरात स्थान नाही. प्रश्न विचारणं, सर्व कामं करणं आणि जबाबदारी घेणं हेच महत्त्वाचं. ‘मुलगी आहे’ म्हणून घाबरण्यापेक्षा तिला प्रत्येक टप्प्यावर सक्षम करणं आवश्यक वाटलं. स्वत:विषयी भ्रम आणि इतरांविषयीही गैरसमज असू नयेत म्हणून नीट बोलण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी वडील म्हणून प्रत्येक वेळी नीट वागलो असं बिलकुल नाही. माझ्या हातूनही चुका झालेल्या आहेत, हे मला सांगण्याचा अवकाश बायको आणि मुलीनं दिला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत चुका होतील पण त्या सुधारता येतील हे आकलन आम्हाला ही मोकळीक देऊन-घेऊन झालेलं आहे.

बाप म्हणून ‘मी मुलीला शिकवणार’ हा चुकीचा ग्रह मनात ठसलेला असतो. पुरुषप्रधान व्यवस्थेत तर तो खोलवर रुजलेला असतो. पर्णनं त्याला तडा दिला आहे. आपण नीट पाहत वा ऐकत नाही हे तिनं अनेक प्रसंगांतून सांगितलं. तिच्या लहानपणीचे दोन प्रसंग सुंदर आहेत. दिवाळीत आम्ही किल्ला केला होता. कागदाची घरं आणि मातीची चित्रं त्यावर ठेवली. रात्री ती तशीच राहिली. सकाळी पाहतो तर हे सर्व गायब. मी पिसाटलो. पर्णला घेऊन मी जवळच्या वस्तीत जाऊ लागलो तर पर्णनं मला मागे खेचलं. ‘आपली चित्र कोणाला तरी गरजेची असतील ना?’ असं विचारलं. मी जागच्या जागी शिळा होऊन थिजलो. तत्क्षणी मागं फिरलो. असं मनात येण्याचीच कमालीची लाज वाटत होती. पण अयोग्य दिशेला गेलो नाही याचा आनंद झाला. वस्तुत: माझ्या मनातील संशयाला कसलाही पुरावा नव्हता. शिवाय आजूबाजूच्या सुशिक्षित घरातील महत्त्वाकांक्षी जाचक आईबाप आणि स्वातंत्र्य गमावलेली मुलं आम्ही पाहत होतो. त्यांनीही हे कृत्य केलं असू शकतं. पण या प्रसंगामुळे घरात बरीच चर्चा झाली. चोरी झाली या दु:खापेक्षा त्यामुळे क्षमाशीलता आली हे अधिक महत्त्वाचं. आम्ही परत जाऊन चित्रं विकत आणली. किल्ला आणि मावळे अधिक देखणे दिसू लागले. दुसरा प्रसंग असा की, मी घरातील बागेत कुठून तरी आणलेले पिवळे जर्द बांबू लावले होते. एक दिवस ते तोडलेले पाहून खवळलो. ते कोवळे बांबू तुंबलेली मोरी साफ करण्यासाठी तोडल्याचं कळताच ‘मी आता बांबू तोडणाऱ्याचे हात तोडतो’ म्हणालो. रोहिणी आणि पर्ण शांत होत्या. पर्ण क्षणभर थांबून म्हणाली, ‘बाबा, तोडलेले बांबू परत उगवतील, पण तोडलेले हात उगवतील का?’ तिच्या या प्रश्नानं डोक्यात बांबू बसल्यागत मी जागा झालो. नंतर कळलं की बांबू माझ्या वृद्ध वडिलांनीच तोडले होते. खरं तर आपल्या सर्वांची मुलं हे शहाणपण आपल्याला देत असतात, पण ‘बापाचा गर्व’ ते ऐकत नाही.

मी इथं बाप होणं किती थोर वगैरे काहीही म्हणू शकत नाही. बाप होणं म्हणजे पुरुषपण सिद्ध होणं असंही मला वाटत नाही. मला माझ्या या अनुभवातून माणूस होता आलं इतकंच सांगायचं आहे. शिवाय आपण आपल्या मुलांचे आईबाप असलो तर असू अन्यथा आजूबाजूच्या जगातील मुलामुलींचेही असू शकू की. ‘वंशाचा दिवा’ ही फालतू कल्पना यानिमित्ते दूर व्हावी. मुलगा श्रेष्ठ असं कधी आम्हाला वाटलंच नाही.

पुढं जगण्याच्या विविध टप्प्यांवर बाप म्हणून नवं शिकायची संधी मला मिळाली. त्यात झपाट्यानं बदललेल्या तंत्रज्ञानाची भर पडली. पर्णच्या पिढीची नवी अभिव्यक्ती अनुभवताना माझ्यात ताजेपणा आला. नाटक करताना काही ‘अडलंय का?’ असं विचारून मला न उमगणाऱ्या गोष्टी ती सांगू लागली. आपण ‘डायरेक्टर’ असावं, ‘डिक्टेटर’ नाही हा पहिला धडा आमच्या नात्यात आम्ही जपला. तसंच आपल्या एकट्यामुळे काही घडत नसतं हा दुसरा धडा गिरवला. त्यामुळे पर्णच्या आयुष्यात आलेल्या लोकांनीही तिच्या सुयोग्य वाढीत हातभार लावलेला आहे याची नम्र जाणीव आम्हाला आहे. तिनं अभिनय करणं आणि नाट्यदिग्दर्शन करणं याला कारणीभूत तिचे या क्षेत्रातील मित्रमैत्रिणी आहेत. तिच्या या पडण्याझगडण्यात ही मंडळी सामील असतात. हे सर्व लोक तिचे आणि आलोकचे विस्तारित कुटुंबीय आहेत. ते एकमेकांची काळजी घेतात. मोकळेपणानं रडतात, हसतात, कौतुक वा टीका करतात. आमच्या पिढीपेक्षा नातेसंबंधातील नवी खुली मूल्यव्यवस्था ते जपतात. हे सारं आज अनुभवताना आमची मुलगी समाजातील जबाबदार व्यक्ती झाल्याचं जाणवत आहे. त्यामुळे छान वाटत आहे.

अशा वेळी आजच्या काळात तिचा बाप म्हणवून घेताना सोबतच्या इतर सर्व मुलामुलींची वडीलधारी व्यक्ती असणंही मला ‘सेलिब्रेट’ करावं वाटतं. त्याकरता आजच्या ‘बापदिवसा’चं निमित्त झालं इतकंच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

atulpethe50@gmail.com