विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

चांद्रयान-२च्या सॉफ्ट लॅिण्डगमध्ये अपयश आले, तरी ते संपूर्ण मोहिमेचे अपयश मानणे चुकीचे ठरेल. ऑर्बिटर आजही चंद्राभोवती फिरून पाणी, मूलद्रव्ये, वायूंच्या अस्तित्वाचा अभ्यास करत आहे. ७ सप्टेंबरपूर्वी आणि त्यानंतरही चांद्रयान-२ ने बरेच काही साध्य केले आहे आणि पुढेही करत राहणार आहे.

एरव्ही केवळ क्रिकेट, फुटबॉल सामने पाहण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा भारत ७ सप्टेंबरला विक्रम लॅण्डर चंद्रावर उतरण्याच्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पहाटेपर्यंत जागला. विक्रमचे सॉफ्ट लॅिण्डग हा खरेतर चांद्रयान-२च्या प्रवासाचा अगदी शेवटचा टप्पा होता. विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित होवो न होवो; मोहीम नक्कीच यशस्वी झाली आहे. चंद्रावरील ज्या जल, वायू, मूलद्रव्यांच्या शोधासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली; त्यांचा शोध यानाचा एक भाग असलेले ऑर्बिटर आजही घेत आहे आणि पुढेही घेत राहील. त्याद्वारे मानवाच्या चंद्राविषयीच्या आकलनात भर पडत राहीलच! शिवाय त्या रात्री टीव्हीच्या पडद्याला चिकटून बसलेल्या नव्या पिढीला जी प्रेरणा या मोहिमेतून मिळाली असेल, ती या एका मोहिमेच्या यशापेक्षाही प्रदीर्घ काळ टिकणारी ठरेल.

आजवरच्या चांद्रमोहिमा चंद्राच्या विषुववृत्ताजवळील भागात झाल्या. अंधारातील दक्षिण ध्रुवाविषयी मात्र मानव अनभिज्ञ होता. चांद्रयान-२ मोहीम वेगळी आणि महत्त्वपूर्ण ठरते, ती याच कारणामुळे! सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले असते, लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून साधारण ६०० किलोमीटर अंतरावर उतरले असते. दक्षिण ध्रुवाच्या एवढय़ा जवळ अद्याप कोणीही गेलेले नाही. पण लॅिण्डग वगळले तरी प्रक्षेपण, परिभ्रमण, लॅण्डर विलग होणे असा मोहिमेचा प्रत्येकच टप्पा आव्हानात्मक होता. चांद्रयान-२ने हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केले. ऑर्बिटर आजही चंद्राभोवती घिरटय़ा घालत आहे. मोहीम ९५ टक्के यशस्वी झाली असे म्हटले जात आहे, ते त्यामुळेच.

दक्षिण ध्रुव महत्त्वाचा का?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश पोहोचत नाही. तिथे सुमारे  उणे २०० अंश सेल्सियस एवढे कमी तापमान असते. शिवाय तिथे वातावरणही नाही. त्यामुळे तेथील कोणताही घटक अनादी काळापर्यंत गोठलेल्या अवस्थेत राहण्याची शक्यता वर्तवली जाते. चंद्रावर पाण्याचा अंश असल्याचे पुरावे चांद्रयान-१ मोहिमेतून हाती लागले आहेत. या संदर्भातील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात येत आहे. ध्रुवावर काही सेंटिमीटर्सपासून काही हजार किलोमीटर्सपर्यंत विविध आकारांची विवरे आहेत. या विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. विवरांत जीवाश्म आढळल्यास त्यांच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळातील घडामोडींवर प्रकाश टाकता येऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ही विवरे संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असली तरी त्यामुळेच लॅिण्डग हे मोठे आव्हान होते.

चंद्रावर चुंबकीय क्षेत्र आणि वातावरणाचा दाट थर नाही. सौर वारे चंद्रापर्यंत थेट पोहोचतात. त्यामुळे ज्या ग्रहांना चुंबकीय क्षेत्र नाही, अशा ग्रहांवरील स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी चंद्र हे उत्तम ठिकाण ठरते. तेथील तापमानाचा अभ्यास करण्यासाठीची उपकरणे लॅण्डरवर आहेत. शिवाय भूगर्भाप्रमाणेच चंद्राच्या गर्भातही कंपने होतात, त्यांची नोंद घेणारी यंत्रणा लॅण्डरवर आहे. लॅण्डरचे भवितव्य सध्या तरी अधांतरीच आहे. पण ऑर्बिटर मात्र उत्तम स्थितीत आहे. त्यावरील उपकरणे चंद्राविषयी अतिशय महत्त्वाची माहिती इस्रोपर्यंत पोहोचवत आहेत आणि सारे काही ठरल्याप्रमाणे होत राहिल्यास सात वर्षे ही माहिती मिळत राहील. ऑर्बिटरवरील उपकरणे आणि त्यांचे कार्य जाणून घेणे आवश्यक आहे.

ऑर्बिटरवरील उपकरणे आणि त्यांचे कार्य

टेरेन मॅपिंग कॅमेरा

हा चांद्रभूमीवरील ५ मीटर किंवा त्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या घटकांचे चित्रण करण्यासाठी सक्षम आहे. चांद्रयान १ वरील टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याचे हे लघुरूप आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचा त्रिमितीय नकाशा तयार करण्यासाठी आवश्यक माहिती मिळवण्याचे काम हा कॅमेरा करत आहे. त्याने गोळा केलेली माहिती चंद्राच्या उत्क्रांतीविषयी जाणून घेण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.

लार्ज एरिया सॉफ्ट एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर

मॅग्नेशियम, अ‍ॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, टिटॅनम, आयर्न आणि सोडियमसारख्या घटकांच्या चंद्रावरील अस्तित्वाचा शोध घेण्याचे काम हे उपकरण करणार आहे. चांद्रभूमीला स्पर्शही न करता या घटकांचा शोध कसा घेता येईल, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे. त्यामुळे सूर्याची क्ष-किरणे पृथ्वीवर थेट पोहोचत नाहीत. पण चंद्राला असे कोणतेही संरक्षक कवच नाही. सूर्याची क्ष-किरणे तिथे थेट पोहोचतात. तिथल्या मातीत असलेल्या प्रत्येक घटकावर त्यांचा होणारा परिणाम वेगळा असतो आणि त्यातून परावर्तित होणारी किरणेही वेगळी असतात. त्यावरून कुठे कोणता घटक आहे, हे जाणून घेता येते. हा अभ्यास हे उपकरण करेल.

सोलार एक्स-रे मॉनिटर

हे उपकरण सूर्याकडून आणि त्याभोवतीच्या वलयातून (कोरोना) उत्सर्जित होणाऱ्या किरणांचे मोजमाप करेल.

ऑर्बिटर हाय रेझोल्युशन कॅमेरा

लॅण्डर जिथे लॅण्ड होणार होता, त्या भागाची हाय-रेझोल्युशन छायाचित्रे टिपण्याची जबाबदारी या कॅमेऱ्यावर होती. ३२ सेंटिमीटर आणि त्यापेक्षा मोठे आकार यातून टिपता येतात. अवतरणाच्या (लॅण्डिंग) जागेवरील विवरे, त्या विवरांभोवतीच्या भिंतींची माहिती देणे हे या कॅमेऱ्याचे काम होते. लॅण्डर विलग झाल्यानंतरही या शक्तिशाली कॅमेऱ्यातून मिळणारी छायाचित्रे चंद्राच्या पृष्ठभागाविषयीच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर :

चंद्रावरील पाणी, त्याचे स्वरूप आणि तिथे असलेल्या विविध धातूंचा अभ्यास करणे हे या उपकरणाचे कार्य आहे. त्यामुळे विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही, तरीही चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात असलेल्या पाण्याचा अभ्यास सुरू आहे. शिवाय चंद्रावर पडून परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांचाही अभ्यास हे उपकरण करेल.

डय़ुएल फ्रिक्वेन्सी सिन्थेटिक अ‍ॅपर्चर रडार

हे उपकरण चंद्राच्या ध्रुवीय भागाचा हाय रेझोल्युशन नकाशा तयार करण्यासाठी साहाय्य करेल. तिथे बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या पाण्याचे प्रमाण मोजण्याचा प्रयत्नही हे उपकरण करेल.

अ‍ॅटमॉस्फिअरिक कॉम्पोझिशनल एक्प्लोरर २

चंद्राभोवती अगदी विरळ स्वरूपात वातावरण आहे. त्याचा अभ्यास हे उपकरण करेल. अशाच स्वरूपाचे उपकरण चांद्रयान- १ मध्येही होते. त्याद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासाचा पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न चांद्रयान- २ मधून करण्यात येणार आहे.

डय़ुएल फ्रिक्वेन्सी रेडिओ सायन्स एक्सपरिमेंट

हे उपकरण चंद्रावर अस्तित्वात असलेल्या वायूंचा अभ्यास करेल. इलेक्ट्रॉनची घनता अभ्यासल्यास वायू नेमका कोणता आहे हे ओळखता येते. ही घनता तपासण्याचे काम हे उपकरण करत आहे आणि त्याची माहिती सातत्याने पृथ्वीवरील केंद्राला देत राहील.

सॉफ्ट लॅण्डिंग

सॉफ्ट लॅिण्डग हे या मोहिमेतील सर्वात मोठे आव्हान होते. विवरांनी व्यापलेल्या पृष्ठभागावर नाजूक उपकरणांना कोणताही धक्का पोहोचू न देता विक्रम लॅण्डर ठरल्या जागी अलगद उतरणे आवश्यक होते. ही जागा कोणती हे निश्चित करण्यासाठी ‘ऑर्बिटर हाय रेझोल्युशन कॅमेरा’, ‘लॅण्डर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा’, ‘लॅण्डर हझार्ड डिटेक्शन अँड अव्हॉयडन्स कॅमेरा’ अशा विविध कॅमेऱ्यांचा उपयोग करण्यात आला होता. चंद्राभोवतीच्या कक्षेत ऑर्बिटर सोडण्याचा प्रयोग भारताने चांद्रयान-१च्या रूपात याआधीच यशस्वी केला होता. त्यामुळे साहजिकच चांद्रयान-२च्या लॅण्डरवर आणि त्याच्या पोटातील रोव्हरवर सर्वाचे लक्ष केंद्रित झाले होते. चांद्रभूमीला समांतर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या लॅण्डरचा मार्ग बदलून त्याला चांद्रभूमीच्या दिशेने सरळ रेषेत खाली आणणे आणि त्याचा वेग कमी करत करत अवतरणासाठी सज्ज करणे हे आव्हान होते. त्यासाठी पाच थर्स्टर्स (लहान इंजिने) लावण्यात आले होते. हा वेग कमी करण्याच्या प्रक्रियेत काही तरी चूक झाली असावी किंवा एखाद्या थर्स्टरमध्ये लहानशी त्रुटी राहिली असावी आणि त्यामुळे सॉफ्ट लॅण्डिंग करण्यात अपयश आले असावे, असा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात येत आहे. ‘रफ ब्रेकिंग फेज’मध्ये लॅण्डरचा वेग १४० मीटर प्रति सेकंद एवढा कमी करण्यात यश आले होते, यानाची दिशाही योग्य होती. हा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानंतर इस्रोच्या कक्षातील शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हे त्याचेच द्योतक होते. पण त्यानंतर काही क्षणांतच ‘फाइन ब्रेकिंग स्टेज’मध्ये पडद्यावर विक्रमचा मार्ग भरकटल्याचे दिसले आणि त्याचे स्थान दर्शवणारा ठिपका स्थिर झाला. विक्रमशी असलेला संपर्क तुटला. शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील आनंदही नाहीसा झाला.

चांद्रयानाचे भाग

जीएसएलव्ही एमके ३

जीएसएलव्ही एमके ३ (जिओसिंक्रोनस लाँच व्हेइकल) हा त्रिस्तरीय प्रक्षेपक होता. चांद्रयानाला सुरक्षितरीत्या अंतराळात पोहोचवण्याची जबाबदारी या प्रक्षेपकावर होती. यात मधोमध एल वन टेन हा मुख्य प्रक्षेपक तर त्याच्या दोन्ही बाजूंना एस २०० ही दोन स्ट्रॅप ऑन रॉकेट्स होती. प्रक्षेपकाच्या डोक्यावर चांद्रयान बसवण्यात आले होते. जीएसएलव्ही एमके ३ हा इस्रोचा सर्वात शक्तिशाली आणि वजनदार (६४० टन) प्रक्षेपक असून तो चार ते साडेचार हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्यास सक्षम आहे.

उष्णतारोधक कवच

यानात ऑर्बिटर, लॅण्डर विक्रम आणि लॅण्डरच्या आतील भागात रोव्हर प्रग्यान होते. ही तीनही उपकरणे एका कॅप्सूलप्रमाणे दिसणाऱ्या उष्णतारोधक कवचात (हिट शिल्ड) बंद करण्यात आली होती. ही कॅप्सूल प्रक्षेपकावर बसवली होती. कवचासहित उपकरणांचे एकूण वजन तीन हजार ८५० किलोग्रॅम होते.

ऑर्बिटर

ऑर्बिटर चंद्राभोवती त्याच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत सात वर्षे प्रदक्षिणा घालेल. याद्वारे चंद्राची हायरेझोल्युशन छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली जातील.

लॅण्डर विक्रम, रोव्हर प्रग्यान

लॅण्डर चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवस कार्यरत राहणार होता आणि तिथून बंगळूरु जवळच्या ‘इंडियन डीप स्पेस नेटवर्क’च्या सतत संपर्कात राहणार होता. त्यात चार संशोधन उपकरणांचा समावेश आहे त्यापैकी एक नासाचे आहे. लॅण्डरच्या आत प्रग्यान रोव्हर आहे. विक्रमचे एकत्रित वजन १४७१ किलोग्रॅम आहे. यात प्रग्यानच्या २७ किलोग्रॅम वजनाचाही समावेश आहे. हा रोव्हर म्हणजे सहा चाके असलेली गाडी असून त्यात दोन संशोधन उपकरणे आहेत. साधारण ५०० मीटपर्यंत अंतर पार करण्याची क्षमता या रोबोटिक रोव्हरमध्ये आहे. सुरुवातीला हा लॅण्डर रशियाकडून मागवण्यात आला होता, मात्र त्यास विलंब झाल्यामुळे अखेर लॅण्डरही भारतातच तयार करण्यात आला.

प्रवासाला एवढे दिवस का?

नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स आणि अ‍ॅल्विन ऑल्ड्रिन ज्या अपोलो ११मधून चंद्रावर गेले त्याने १६ जुलै रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले आणि २४ जुलैला ते चंद्रावर उतरले. १९६९ मध्ये जर अवघ्या नऊ दिवसांत यान पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचले तर २०१९मध्ये भारताच्या मानवरहित चांद्रयान-२ ला चंद्रावर पोहोचण्यास ४७ दिवस का लागणार आहेत, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर आर्थिक गणितांत मिळते. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पोहोचण्याचा कालावधी जेवढा कमी तेवढी इंधनाची गरज आणि पर्यायाने खर्चही अधिक. भारताने अवघ्या ९७८ कोटी रुपयांत म्हणजेच १४१ दशलक्ष डॉलर्समध्ये ही मोहीम राबवली आहे. हा खर्च चीनच्या अशाच स्वरूपाच्या मोहिमेवरील खर्चापेक्षा ४० दशलक्ष डॉलर्सने कमी आहे. हॉलीवूडच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स एन्डगेम’च्या चित्रीकरणासाठी तब्बल ३५६ दशलक्ष डॉलर्स एवढा अवाढव्य खर्च करण्यात आला होता. याव्यतिरिक्त ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ आणि ‘हॅरी पॉटर’च्याही काही भागांच्या चित्रीकरणासाठी चांद्रयान-२पेक्षा अधिक खर्च झाला होता. याचा विचार करता चांद्रयानसाठी करण्यात आलेला खर्च कमी आहे. इंधन बचत हे त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे.

उल्लेखनीय योगदान

चांद्रयानसारख्या मोठय़ा मोहिमा प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ आणि अभियंते रात्रंदिवस कार्यरत असतात. तरीही यात विशेष उल्लेख केलाच पाहिजे तो इस्रोच्या वैज्ञानिक रितू करिधाल आणि मुथय्या वनिता यांचा. रितू करिधाल यांच्यावर चांद्रयान-२च्या मोहीम संचालकपदाची तर मुथय्या वनिता यांच्यावर प्रकल्प संचालक पदाची जबाबदारी आहे. वनिता या इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअर असून ३२ वर्षे इस्रोच्या सेवेत आहेत. करिधाल या एअरोस्पेस इंजिनीअर असून २२ वर्षे इस्रोमध्ये कार्यरत आहेत. यानाच्या प्रक्षेपणापूर्वी इंधन टाकीतील दाब योग्य प्रमाणात नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. डी. सोमनाथ, प्रक्षेपण संचालक जे. जयप्रकाश आणि प्रक्षेपक संचालक रघुनाथ पिल्ले यांनी महत्त्वाची भूमिका पार बजावली.

विक्रम लॅण्डरचे आयुष्य १४ दिवसांचे आहे. लॅण्डरचे छायाचित्र इस्रोला मिळाले आहे. त्याचे हार्ड लॅण्डिंग झाले असावे, म्हणजेच ते अलगद उतरण्याऐवजी आदळले असावे, असा कयास वर्तवण्यात येत आहे. ठरल्या कालावधीत लॅण्डरशी संपर्क झाल्यास उत्तमच. संपर्क होऊ शकला नाही, तरीही मोहीम अपयशी झाली असे म्हणणे चूकच ठरेल. आयआयटीचे प्राध्यापक वरुण भालेराव सांगतात, ‘अशा स्वरूपाच्या मोहिमांचे यशापयश असे त्वरित ठरवता येत नाही. प्रक्षेपणापासून चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमीपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक टप्पा हे एक आव्हान होते. आजवर अनेक देशांची याने प्रक्षेपणाच्या टप्प्यावरच स्फोट होऊन निकामी झाली आहेत. याचा विचार केल्यास भारताचे यश नक्कीच कौतुकास्पद ठरते. नेमका काय बिघाड झाला असेल, याचा अभ्यास इस्रोचे संशोधक करत आहेत. आताच कोणत्याही निष्कर्षांप्रत पोहोचणे अवैज्ञानिक ठरेल.’ अंतराळ संशोधनात इतर प्रगत देशांच्या तुलनेत फार उशिरा उतरलेल्या आणि अतिशय कमी खर्चात विविध मोहिमा राबवण्याचे धैर्य बाळगणाऱ्या भारतासाठी हे मोठेच यश आहे. ऑर्बिटरकडून सातत्याने मिळत असलेल्या माहितीच्या आधारे पृथ्वी, चंद्र आणि त्या अनुषंगाने विश्वाच्या भूत-भविष्यावर आणखी प्रकाश नक्कीच पडणार आहे. अवकाश संशोधन हे एखाद-दोन मोहिमांच्या यशापयशात मोजता येणे शक्य नाही. अथांग अवकाशाचा शोध न संपणारा आहे. त्यातील हे एक पुढचे पाऊल आहे.

एकूण प्रवास : ३,८४,४०० किलोमीटर्सयानाचे वजन : ३,८५० किलोग्रॅमप्रक्षेपकाची क्षमता : चार ते साडेचार हजार किलोग्रॅमएकूण संशोधन उपकरणे : १४ प्रवासासाठी आवश्यक कालावधी : ४७ दिवसमोहिमेचा खर्च : ९७८ कोटी रुपये

प्रक्षेपण आणि पुढील प्रवास

२२ जुलै

चांद्रयानचे प्रक्षेपण करताना सुरुवातीला प्रक्षेपकाच्या दोन्ही बाजूंना असलेली एस २०० ही स्ट्रॅप ऑन रॉकेट्स प्रज्ज्वलित करण्यात आली आणि चांद्रयानाचा प्रवास सुरू झाला. यान ४४ किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर मध्यभागी असलेला एल वन टेन प्रक्षेपक प्रज्ज्वलित करण्यात आला. त्या वेळी त्याचा वेग १.७४ किलोमीटर प्रति सेकंद होता. चांद्रयान ६३ किलोमीटर उंचीवर असताना एस २०० रॉकेट्स जळून विलग झाली. त्या वेळी यानाचा वेग २ किलोमीटर प्रति सेकंद होता. ११५ किमी उंचीवर पोहोचल्यानंतर चांद्रयान प्रक्षेपकापासून विलग झाले.

१८० किमी उंचीवर पोहोचल्यानंतर क्रायोजेनिक इंजिनचे काम सुरू झाले. १८२ किलोमीटर उंचीवर असताना आणि १०३ किलोमीटर प्रति सेकंद वेग प्राप्त झाला असताना चांद्रयान पृथ्वीभोवती फिरू लागले आणि त्याभोवतीचे उष्णतारोधक कवच विलग झाले. यानाचे पृथ्वीभोवती परिभ्रमण सुरू झाले. पाच परिक्रमांपैकी प्रत्येक परिक्रमेगणिक त्याची कक्षा वाढवत त्याला चंद्राच्या जवळ नेण्यात आले.

१४ ऑगस्ट

२.२१ वाजता यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले आणि त्याचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

२० ऑगस्ट

९.०२ वाजता यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्याचे चंद्राभोवती परिभ्रमण सुरू झाले. पाचपैकी प्रत्येक परिभ्रमणागणिक यान चांद्रभूमीच्या नजीक जाऊ लागले.

२ सप्टेंबर

१.१५ वाजता लॅण्डर विक्रम ऑर्बिटरपासून विलग झाले. ऑर्बिटर आणि लॅण्डरचे स्वतंत्रपणे परिभ्रमण सुरू झाले. लॅण्डरने ४ दिवस परिभ्रमण केले.

७ सप्टेंबर

लॅण्डिगची प्रक्रिया सुरू झाली. लॅण्डरने चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० मीटर अंतरावर काही काळ घिरटय़ा घातल्या. त्यानंतर ते हळूहळू चंद्राच्या जवळ जाऊ लागेल. पहाटे लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमीवर असताना चांद्रयानाचा ‘इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अ‍ॅण्ड कमांड नेटवर्क’शी असलेला संपर्क तुटला.

८ सप्टेंबर

चंद्राच्या पृष्ठभागावरील लॅण्डरची छायाचित्रे ऑर्बिटरने टिपली, मात्र लॅण्डरशी संपर्क होऊ शकला नाही. लॅण्डरचे आयुष्य १४ दिवसांचे आहे. त्यामुळे हा कालावधी संपेपर्यंत संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे.