अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीदिनापर्यंत म्हणजे १७ नोव्हेंबपर्यंत न्यायालय या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे, तत्पूर्वी हिंदू व मुस्लीम समाजातील धार्मिक नेते व संघटनांकडून निकाल काहीही लागो शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

आज उत्तर प्रदेशमधील मुस्लिम धर्मगुरूंनी शुक्रवारच्या नमाजच्या अगोदर मशिदींमध्ये निकालाच्या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन केले. समाजातील लोकांना कोणत्याही परिस्थितीत जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लखनऊमध्ये शाही इमाम खालिद रशीद फिरंगी महाली यांच्या नेतृत्वात हे आवाहन करण्यात आले आहे. ते इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत.

सर्वोच्च न्यायालयचा जो काही निकाल असेल त्याचा आदर असला पाहिजे. त्या ठिकाणी जल्लोष किंवा नागरिकांकडून विरोध होऊ नये. एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य देखील व्हायला नको. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांतता कायम राखणे आवश्यक आहे, असे रशीद यांनी लखनऊ येथे जवळपास ५०० नागरिकांच्या समुहास संबोधित करताना सांगितले आहे. तसेच. जातीय सलोखा व गंगा-जमुनी तहजीबच्या धाग्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निकालाच्या पार्श्वभूमीवर, निकाल काही असो प्रत्येकाने तो खुल्या मनाने स्वीकारायला हवा. निकालानंतर देशाचे वातावरण सौहार्दपूर्ण राहिले पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे. असे सांगण्यात आले होते.