जगभरात करोना विषाणूचा कहर सुरू आहे. संपूर्ण जग या जिवघेण्या विषाणूचा सामना करत आहे. अनेक देशांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लागू केला आहे. तसेच मोठ्या प्रमानात लसीकरण देखील सुरू आहे. करोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या अमेरिकेने कोरोनाविरूद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरची करोना लस मंजूर केली आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनासाठी फायझर-बायोटेकच्या करोना लसीला तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. एफडीएचे कार्यकारी आयुक्त डॉ. जेनेट वुडकॉक म्हणाले की, करोना लस वापरण्याच्या हा निर्णय आम्हाला पुन्हा सर्वसाधारण स्थितीत घेऊन जाईल. पालक यासाठी खात्री बाळगू शकतात. एजन्सीने सर्व उपलब्ध डेटाचे सखोल पुनरावलोकन केले आहे.

US Food and Drug Administration (FDA) authorizes Pfizer-BioNTech COVID-19 vaccine for emergency use in adolescents (12-15 years) in another important action in the fight against pandemic: FDA pic.twitter.com/1ScIC6823d

— ANI (@ANI) May 10, 2021

यापूर्वी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १६ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी फायझर लसीला मंजुरी दिली होती. दरम्यान, फायझर कंपनीला आढळले की त्यांची लस लहान मुलांवर चांगले काम करते. त्यानंतर एका महिन्यानंतर ही घोषणा करण्यात आली. फायजर लसीते दोन डोस आता १२ ते १५ वर्षे वयोगटातील आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी मंजूर केली आहे.

भारतात काय परिस्थिती?

जगभरात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतात देखील वेगाने लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र, लसीच्या उपलब्धतेमुळे लसीकरण मोहिमेमध्ये अडथळे येत असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आत्तापर्यंत १७.३५ कोटींहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवण्यात आले आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या मानाने ही संख्या १५ टक्क्यांच्या जवळपास असल्यामुळे हा आकडा मोठा मानला जात आहे. मात्र, भारतात लसीकरणापेक्षाही जनतेनं करोनाचे नियम पाळणं जास्त महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसऱ्या लाटेचा भारत सामना कसा करू शकेल? याविषयी भूमिका मांडली आहे. “जर आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर करोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल. नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे भारतात लसीकरणासोबतच नियमांची कठोर अंमलबजावणी हे देखील करोना नियंत्रणात आणण्याचं महत्त्वाचं साधन ठरणार आहे.