अन्न सुरक्षा योजनेबाबत भारताने उपस्थित केलेले प्रश्न विचारात घेऊन त्यावर जागतिक व्यापार संघटेनेच्या (डब्ल्यूटीओ) सदस्यांमधील करार दृष्टिपथात आल्याचे संकेत मिळत असल्याने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड असल्याचे मानले जात आहे. या बाबत करार करणे ही केवळ औपचारिकता उरली असून केंद्रीय मंत्री आनंद शर्मा अंतिम बैठकीला हजर राहणार आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या अंतिम चर्चेत भारताने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे, असे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.तथापि, शर्मा यांनी चर्चेच्या अंतिम फेरीसाठी जाताना कोणतेही आश्वासन दिले नाही. कराराचा अंतिम मसुदा आपण पाहिलेला नाही, असे शर्मा म्हणाले. अन्न सुरक्षेच्या प्रश्नावरील आपल्या भूमिकेवर भारत ठाम आहे, असेही शर्मा यांनी वार्ताहरांना सांगितले.