जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा पथकांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले अशी माहिती पोलिसांनी दिली. चार ते पाच दिवसांपूर्वी हे दहशतवादी सीमापार करुन भारतीय हद्दीत घुसले होते. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा पथकांनी शोध मोहिम राबवली होती.

या शोध मोहिमेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी यंत्रणेने सुंदरबनी भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

या चकमकीत सुरक्षा पथकांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस.पी.वेद यांनी दिली. या कारवाईत भारतीय सुरक्षा दलाचा एकही जवान जखमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात आधी राजौरीचे जिल्हाधिकारी शाहीद चौधरी यांनी टि्वट करुन या चकमकीची माहिती दिली.