महागाईमुळे देशाचं कंबरडं मोडलं होतं, परंतु गेल्या पाच वर्षात भारताला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणलं. मागील सरकारपेक्षा आताच्या काळातील महागाईचा दर घसरल्याचा दावा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पियुष गोयल यांनी भाषण केलं. आमच्या सरकारने पारदर्शकतेचं नवीन युग सुरू केलं आहे, भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवले असे अर्थसंकल्पीय भाषणांत गोयल यांनी वक्तव्य करताच विरोधी बाकांवर जोरदार निषेध नोंदवण्यात आला. दुसरीकडे भाषणाच्या सुरूवातीला ‘हमारे सरकारने कमरतोड महंगाई की कमर ही तोड दी’ बजेट भाषणात पियुष गोयल यांनी असे म्हटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदम आवेशात बाक वाजवून समर्थन केले.

सरकारच्या धोरणांमुळे लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावला आहे. आमच्या सरकारने देशातून घराणेशाही, भ्रष्टाचार यांचं कंबरडं मोडलं, महागाईचा दर घटवला असा दावही गोयल यांनी केला. गेल्या पाच वर्षात देशाला प्रगतिपथावर आणलं, देशाचा आत्मविश्वास वाढवला. भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी आणि जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सरकारच्या धोरणांमुळे लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावल्याचा दावाही गोयल यांनी केला.

अरुण जेटलींना आत्ता या क्षणाला मिस करतोय. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो असे भावनिक विधान अर्थसंकल्पाच्या भाषाणाच्या सुरूवातीलाच पियुष गोयल म्हणाले.