नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांना शहिदांचा दर्जा नाकारण्यात आला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती अनिल अंबानी याला सदैव आनंदी राहण्यासाठी ३० हजार कोटी रुपयांचे बक्षिस देतात, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी चढविला. शूर जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांच्या कुटुंबीयांचा संघर्ष सुरू झाला, या जवानांना शहिदांचा दर्जा देण्यात आला नाही, उलटपक्षी या व्यक्तीने कधीही काहीच दिले नाही, केवळ घेतच राहिला, त्यालाच ३० हजार कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले, असे ट्वीट राहुल गांधी यांनी  केले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल अनिल अंबानी यांना दोषी धरल्याचे वृत्त माध्यमांनी दिले, त्याचा टॅग गांधी यांनी दिला आहे.