भाजपीचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी बुधवारी श्रीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी या ठिकाणी भीतीचे वातावरण तयार करत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून उचलली जाणारे पावलं येथील परिस्थितीनुसार आहेत. जम्मू-काश्मीर विशेषतः काश्मीरमध्ये सैन्य तैनात करणे अथवा कमी करणे ही नेहमीची प्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले. राम माधव यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेदरम्यान या ठिकाणी अतिरिक्त सैन्य तैनात केले जाते. त्यामुळे जास्तीचे सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाकडे वेगळ्या अर्थाने पाहण्यात केवळ येथील स्थानिक नेत्यांचा स्वार्थ दडलेला आहे. आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणे सुरू असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हे राजकीय नेते नाटक करत असल्याचेही माधव म्हणाले. Ram Madhav, BJP: Extra forces are deployed here during Amarnath Yatra, we also have to conduct block-level elections. But linking this to something else is only due to selfish motives. They are doing drama to protect themselves, now when action against corruption is being taken. — ANI (@ANI) July 31, 2019 महबूबा मुफ्तीवर निशाणा साधत माधव म्हणाले की, स्वतःला राजकीयदृष्ट्या टिकवण्यासाठी त्यांच्याकडून अशाप्रकारची वक्तव्य केली जात आहेत. आपला जनाधार वाचवण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. तर, आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये पुढे जाण्यासाठी काम करायचे आहे, शिवाय विधानसभा निवडणुका देखील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काल संसदेत ज्याप्रकारे काहीजणांनी अनुपस्थित राहून तिहेरी तलाक विधेयकास समर्थन दिले, आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. अशाचप्रकारे पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कामांचे समर्थन करा, उघडपणे करू शकत नसाल तर गैरहजर राहून करा असेही ते म्हणाले.