अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या महंत परमहंस दास यांना पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतलं आहे.पोलीस महंत परमहंस दास यांना घेऊन रुग्णालयात गेल्याची माहिती आहे.


 
प्रभू रामचंद्र यांच्या नावावर मते मिळवून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपचे सरकार आता राम मंदिर उभारण्याची जबाबदारी टाळत आहे असा आरोप करत परमहंस दास हे गेल्या सात दिवसांपासून राम मंदिरासाठी आमरण उपोषण करत होते.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही परमहंस दास यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवली होती, अशी माहिती आहे. पण परमहंस दास यांनी त्यास नकार दिला. जर राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ठोस आश्वासन देणार असतील तरच उपोषण सोडण्याबाबत विचार करु शकतो असं ते म्हणाले होते. आपल्या आश्रमातील अशोक वृक्षाच्या सावलीत परमहंस दास उपोषणाला बसले होते. उपोषण सोडण्यासाठी प्रशासन दबाव आणत असल्याचंही त्यांनी यापूर्वी सांगितलं आहे.