झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. येथील ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे.

निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे. झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील ८१ मतदारसंघापैकी ६७ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. शिवाय  १९ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.

निवडणूक आयोग झारखंडबरोबरच दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम देखील घोषित करले, असे वाटत होते . मात्र आयोगाने केवळ झारखंडच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात येणार आहे.

झारखंडमध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासमोर या निवडणुकीस समोरे जाताना काही आव्हानं आहेत. ज्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीबरोबर जमावाकडून घडणाऱ्या हत्या व जमावाकडून होणार हिंसाचार यांचा समावेश आहे.