पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेचा भडीमार होतो आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणींना फसवलं, ते गुरु असूनही नाटकं करून मोदींनी आडवणींना फसवलं. मोदींमध्ये एवढा अहंकार आहे की कुणी त्यांना नमस्कार केला तर त्याच्याकडेही दुर्लक्ष करतात. आडवाणींनीही त्यांना सॅल्युट केला होता मात्र त्यांच्याकडेही मोदींनी दुर्लक्ष केलं असंही नायडू यांनी म्हटलं आहे.

 

निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सफाई कामगारांचे पाय धुऊन नाटक करत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर मोदींना कामगारांची आठवण झाली का? असाही प्रश्न नायडू यांनी विचारला आहे. ज्या सफाई कामगारांचे पाय मोदींनी धुतले त्याआधी गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी काम करत आहेत तेव्हा मोदींना ते आठवले नाहीत का? असाही प्रश्न नायडू यांनी उपस्थित केला आहे. चार वर्षात मोदींनी कधी कामगारांचे पाय धुतले कुणाला आठवतंय का? असंही नायडूंनी विचारलं आहे.

प्रयागराज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्नान केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले आणि त्यांचा सन्मान केला. त्यांच्या या कृतीवर सगळेच विरोधक तुटून पडले आहेत.