भारतातील लोक करोनासोबत मोठी लढाई लढत आहेत. कोरोनामुळे देशभर परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. परंतु करोना काळात लसीची वाढती मागणी होत असतानाही देशात लसींचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. आता कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीअभावी लक्ष्य केले आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्वीट केले की, “भारत हा सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजपा सरकारने १२ एप्रिल रोजी लसीकरणाचा उत्सव साजरा केला, परंतु कोणत्याही लसीची व्यवस्था केली नाही आणि या ३० दिवसात देशात लसीकरण ८२% ने कमी झाले आहे.”

“मोदी जी लस कारखान्यांमध्ये गेले, फोटो काढले. परंतु जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या सरकारने प्रथम लस ऑर्डर का केली? अमेरिका आणि इतर देशांनी भारतीय लसी कंपन्यांना आधीचं ऑर्डर दिली होती. याची जबाबदारी कोण घेईल?”, असा प्रश्न देखील प्रियांका गांधी यांनी विचारला आहे. देशात घरोघरी लसीकरण न करता करोनाशी लढाई अशक्य असल्याचे देखील प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले.

यापुर्वी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून देखील प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली होती. “पंतप्रधानांसाठी नवीन घर बांधण्याऐवजी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी संसाधने वापरली पाहिजेत”, असे त्यांनी म्हटले होते.

राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची भाजपाच्या ‘सकारात्मकता मोहिमे’वर टीका

आरएसएस आणि भाजपाडून करोना परिस्थिमध्ये सकारात्मकता मोहिम राबवण्यात येत आहे. मात्र विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. कॅांग्रेत नेते राहूल गांधी आणि ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विटरवरुन सरकारवर निशाणा साधालाय. “एक शोकाकुल राष्ट्र म्हणून आपण सध्या करोना परिस्थितीचा सामना करत आहोत. आपल्या आजूबाजूस घडत असलेल्या शोकांतिकांना आपण सामोरे जात असतानाच खोटी माहिती आणि प्रचार हा सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली पसरवला जातोय, हे लज्जास्पद आहे,” असं किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, “सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला सरकारच्या आंधळ्या प्रचारकांपैकी एक होण्याची गरज नाहीय,” असा टोलाही किशोर यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोना कालावधीमध्ये खूप काम करत असल्याची एक लिंक मंगळवारी भाजपाच्या अनेक नेत्यांनी शेअर केल्याने त्यावरुन आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याचसंदर्भात किशोर यांनी हे ट्विट केल्याचं बोललं जात आहे.

यावरून कॅांग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सकारात्मक विचारसरणीचा आधार देणे म्हणजे आरोग्य कर्मचारी आणि करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या परीवारांसाठी मस्करी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले, वाळूमध्ये डोकं टाकणे म्हणजे सकारात्मकता नाही, ही देशवासीयांची फसवणूक आहे.” त्यांनी ट्विटमध्ये एक बातमी देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये भाजप सरकार करोनाबाबत सकारात्मक गोष्टींवर भर टाकणार असल्याचे म्हटले आहे.