स्वतःची अटक टाळण्यासाठी आणि भारतीय अधिकाऱय़ांपासून वाचण्यासाठी ललित मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या कुटुंबियांना किती पैसे दिले, याची माहिती त्यांनी देशाला दिली पाहिजे, असा प्रश्न विचारत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी ‘ट्विटर’च्या माध्यमातून पुन्हा एकदा सुषमा स्वराज यांच्यावर हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले, जेव्हा कोणतीही चुकीची गोष्ट केली जाते. त्यावेळी त्याबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळण्यात येते. ललित मोदी प्रकरणातही सुषमा स्वराज यांनी संपूर्णपणे गुप्तता पाळली होती. सुषमा स्वराज यांच्याशिवाय त्यांच्या मंत्रालयातील कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतरच ब्रिटन सरकारने आपला निर्णय बदलला होता. त्याचबरोबर जेव्हा अशी मदत केली जाते, त्यावेळी आर्थिक व्यवहारही होतात. त्यामुळे या प्रकरणात सुषमा स्वराज यांच्या कुटुंबियांना पैसे मिळाले आहेत. त्याबद्दल सुषमा स्वराज यांना देशाला माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.


माझ्याजागी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते, असा प्रश्न सुषमा स्वराज यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये निवेदन करतान केला. त्यालाही सोनिया गांधी यांच्या वतीने राहुल गांधी यांनी उत्तर दिले. सोनिया गांधींनी अशा पद्धतीने मदत केलीच नसती, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.