करोनाच्या काळात बँक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या कडक नियमांनंतरही बँकांमध्ये फसवणुकीचे प्रकार घडतच आहेत. या वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेतात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षित बँकिंगाठी नवी एटीएम सेवा सुरु केली आहे.

बँकेने ट्वीट करीत याची माहिती दिली. बँकेनं म्हटलं, जेव्हा बँकांना एटीएममधून बॅलन्स किंवा मिनी स्टेटमेंट चेक करण्याची मागणी होईल, तेव्हा ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून अलर्ट करण्यात यावं. कारण यामुळे व्यवहार हा संबंधित ग्राहकाद्वारेच होत आहेत की नाही, याची खात्री करता येईल.

यामुळे हे लक्षात येईल की, ग्राहक स्वतः आपल्या डेबिट कार्डद्वारे व्यवहार करतोय की नाही हे कळेल. यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल आणि ग्राहकांना सुरक्षित बँकिंगची सुविधा मिळेल. जर व्यवहार इतर कोणी करत असेल तर एसएमएसद्वारे ग्राहकाला सूचना मिळाल्याने तो तात्काळ आपलं डेबिट कार्ड ब्लॉक करु शकेल, असंही बँकेने स्पष्ट केलं.

एसबीआयच्या ४४ कोटी खातेधारकांना दिलासा

दरम्यान, एसबीआयने खातेधारकांना दिलासा देताना नुकतेच काही सेवांवरील शुल्काची आकारणी बंद केली होती. यामध्ये एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बॅलन्सचा समावेश होता. एसबीआयच्या ४४ कोटींपेक्षा अधिक बचत खातेधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता ग्राहकांकडून एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बॅलन्ससाठीचे शुल्क वसूल केले जाणार नाही, ही सेवा मोफत झाली आहे. त्याचबरोबर बँकेने हे देखील म्हटलंय की, बँकिंगच्या अनावश्यक अॅप्सपासून सुटका करुन घेण्यासाठी ग्राहकांनी YONOSBI हे एकच अॅप डाउनलोड करावं.