पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेले जम्मू आणि काश्मीरमधील जनजीवन अद्याप पूर्वपदावर आले नसून अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, असे मत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले. निवडणुका झाल्याच तर श्रीनगरमध्येदेखील शून्य टक्के मतदान होईल, असेही ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, काश्मीरमधील लोक अद्याप पुरामुळे ढासळलेले आपले जगणे सावरू पाहत आहेत. त्यामुळे या घडीला निवडणुका घेऊ नयेत, असे नॅशनल कॉन्फरन्सचे स्पष्ट मत आहे.
८७ सदस्यीय जम्मू आणि काश्मीर विधानसभेची मुदत १९ जानेवारी २०१५मध्ये संपत आहे. तेथे डिसेंबर अखेरीस निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार असला तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पुराने केवळा काश्मीरच्या ग्रामीण भागांना फटका बसलेला नाही तर काश्मीर खोऱ्यातील अनेक वस्त्यांनाही त्याचा तडाखा बसला आहे, याकडे ओमर यांनी लक्ष वेधले.