संजय दत्त मनाने कणखर असून, त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य असल्याचे त्याचे वकील सतीश माने-शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षाची शिक्षा सुनावली. टाडा न्यायालयाने संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्याखाली सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती सहा वर्षांवरून पाच वर्षे केली.
शिंदे यांनी टाडा न्यायालयात संजय दत्तची बाजू मांडली होती. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी संजय दत्तशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी न्यायालयाने दिलेला निर्णय मला मान्य असल्याचे संजय दत्तने त्यांना सांगितले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येऊ शकते. मात्र, त्यामुळे संजय दत्तला दिलासा मिळेल का, हे आता सांगता येणार नाही, असेही शिंदे म्हणाले.
संजय दत्तने याआधी १८ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला आणखी साडेतीन वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. माझ्या मते साडेतीन वर्षे हा काही फार मोठा कालावधी नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
१९९३ बॉम्बस्फोट निकाल : संजय दत्तला पाच वर्षे शिक्षा
१९९३च्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानचाच हात – सुप्रीम कोर्ट