मुंबईत २००८ मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार झाकीउर रेहमान लख्वी याला स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भारताने वेळीच संतप्त भावना व्यक्त केल्याने त्याला तुरुंगातून सोडण्यापूर्वीच  बुधवारी सकाळी त्याला पुन्हा अटक करण्यात आली. एवढे होऊनही तो दोनच दिवस पोलीस कोठडीत राहणार असून त्यापुढे पाकिस्तान सरकार काय भूमिका घेते हे महत्त्वाचे आहे.
लख्वी याला इस्लामाबाद येथील गोलरा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या एका एफआयआरच्या (प्राथमिक माहिती अहवाल)आधारे अटक करण्यात आली आहे. त्यानुसार त्याने महंमद अन्वर या इसमाचे अपहरण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याला दंडाधिकारी मलिक अमन यांच्यापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. लख्वी याला रावळपिंडीतील अदैला तुरुंगातून सोडण्यात येणार होते. त्यासाठी १० लाख रुपयांच्या जातमुचलक्याची हमी त्याने दिली होती. तुरुंग अधीक्षकांना त्याच्या सुटकेचा आदेश मिळण्याआधीच त्याला अपहरणप्रकरणी अटक करण्यात आली. लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले की, सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा आदेशान्वये आणखी तीन महिने स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश फेटाळून लावला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांना बोलावून निषेध नोंदवला होता. भारताने आपल्या तीव्र भावना पाकिस्तानला कळवल्या होत्या.  पाकिस्तान यापुढेही अतिरेक्यांसाठी आश्रयस्थान राहणार आहे हे यातून स्पष्ट होत आहे. परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी बसित यांना बोलावून हा मुद्दा उपस्थित केला होता.
मंगळवारच्या घडामोडीनंतर लख्वीचे वकील अब्बासी यांनी सांगितले की, कार्यकारी अधिकारी न्यायालयाचे आदेश पाळायला तयार नाहीत असाच याचा अर्थ आहे. आपल्या अशिलास दुसऱ्या प्रकरणात अटक करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आला आहे.
 इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नुरूल हक एन कुरेशी यांनी लख्वी याचा सरकारच्या आदेशाविरुद्धचा आव्हान अर्ज स्वीकारून त्याला आणखी तीन महिने तुरुंगात ठेवण्याचा सरकारचा आदेश फेटाळून लावला होता व १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. मुंबई हल्ल्यातील प्रत्येक सुनावणीस हजर राहिले पाहिजे अशी तंबीही न्यायालयाने त्याला दिली होती.