Andhra Pradesh Crime News : बँकेचं कर्ज न फेडणाऱ्यांवर बँका कायदेशीर कारवाई करतात. परंतु, खासगी पतसंस्था, फायनान्स कंपन्याकडून किंवा सावकारी कर्ज घेऊन ते न फेडणाऱ्यांना अनेक क्रूर समस्यांचा सामना करावा लागतो. फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी कर्ज न फेडणाऱ्या व्यक्तीच्या घरातील साहित्य घेऊन गेल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र आंध्र प्रदेशमधील एका फायनान्स कंपनीने क्रूरतेचा कळस केला आहे. येथील विजयानगरममधील एका कुटुंबाने आरोप केला आहे की एका खासगी फायनान्स कंपनीमधील कर्ज वसुल करणाऱ्या एजंटांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं आहे. कारण ते दिलेल्या मुदतीत फायनान्स कंपनीचं कर्ज फेडू शकले नाहीत.

कुटुंबाने दावा केला आहे की या एजंटांनी अरिगीपालम येथील कंपनीच्या कार्यालयात त्यांच्या मुलाला ओलीस ठेवलं आहे. तसेच मुलाची आई राजेश्वरी यांच्याकडे ६०,००० रुपयांचं कर्ज फेडण्याची मागणी केली आहे. राजेश्वरी यांनी तक्रारीत म्हटलं आहे की कर्ज वसूल करणाऱ्या एजंटांनी आधी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या मुलाचं अपहरण केलं. राजेश्वरी यांनी याप्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा >> Ashwini Vaishnaw : लोकसभेत Reel मंत्री म्हटल्यावर रेल्वेमंत्र्यांचा संताप अनावर; म्हणाले, “तुमचं खूप झालं आता…”

कर्ज वसुल करणाऱ्या एजंटांशी आमचा संबंध नाही, फायनान्स कंपनीचं घुमजाव

दरम्यान, कर्ज वसूल करणारे एजंट (लोन रिकव्हरी एजंट) रामकृष्ण व शिवा यांनी सांगितलं की “या मुलाच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या मुलाला इथे घेऊन आलो आहोत.” दरम्यान, या फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक रामराव यांनी कर्ज वसूल करणारे एजंट शिवा व रामकृष्ण यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं, तसेच या दोन एजंटांचा आणि आमच्या कंपनीचा देखील काही संबंध नाही, असंही रामराव म्हणाले.

हे ही वाचा >> VIDEO: पाणघोड्याच्या शिकारीसाठी सात सिहिणींचा घेराव; पाणघोड्यानं दिली जोरदार टक्कर, शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपहरणाचा गुन्हा दाखल

दरम्यान, राजेश्वरी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश म्हणाले, राजेश्वरी यांच्या तक्रारीनंतर त्यांच्या मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी शिवा व रामकृष्ण या एजंटांविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम १३७ – २ व महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कलम ७९ – ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, या महिलेचे (राजेश्वरी) पती हे अद्याप समोर आलेले नाहीत.