नवी दिल्ली : दिल्ली राज्याची सत्ता गमावलेल्या आम आदमी पक्षाने (आप) गुजरात आणि पंजाबमधील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून दमदार राजकीय पुनरागमन केले. चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले.
केरळमध्ये काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस तर गुजरातमधील दोनपैकी एक मतदारसंघ भाजपने जिंकला. या निकालामुळे ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांना मोठा दिलासा मिळाला. पंजाबमधील लुधियाना-पश्चिम मतदारसंघामध्ये ‘आप’ने राज्यसभेचे विद्यामान सदस्य संजीव अरोरा यांना मैदानात उतरवले होते. अरोरा यांनी काँग्रेसच्या भारतभूषण आशू यांचा १० हजार मतांनी पराभव केला. ही पोटनिवडणूक ‘आप’ने प्रतिष्ठेची केली होती. अरोरा यांच्या प्रचारासाठी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी असे मातबर नेते उतरले होते. पंजाबमध्ये आणखी दोन वर्षांनी २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्याने हा विजय सत्ताधारी पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
गुजरातमधील विसावदर मतदारसंघ कायम राखत ‘आप’ने भाजपला जबरदस्त दणका दिला. ‘आप’चे तत्कालीन आमदार भूपेंद्र भयानी यांनी पदाचा राजीनामा देत २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर ‘आप’ने पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपचे किरीट पटेल यांचा १७ हजार मतांनी पराभव केला. हा मतदारसंघ भाजपला २००७ पासून जिंकता आलेला नाही.
गुजरातमधील कडी मतदारसंघ मात्र भाजपने राखला. भाजपच्या राजेंद्र चावडा यांनी काँग्रेसच्या रमेश चावडा यांचा ३९ हजार मतांनी पराभव केला. गुजरातमधील दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. इथे २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघ तृणमूल काँग्रेसने कायम राखला. पक्षाचे आमदार नसुरुद्दीन अहमद यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी अलिफा अहमद यांना तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिली होती. अलिफा यांनी भाजपच्या आशीष घोष यांचा तब्बल ५० हजार मतांनी पराभव केला. इथेही एप्रिल-मे २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट, एकीचा मृत्यू
कोलकाता : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कालिगंज येथे झालेल्या बॉम्बस्फोटात एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. कालिगंजमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच ही घटना घडली. या प्रकरणातील दोषींविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील असे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.