RCB Stampede Updates: बंगळुरू चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मनोज कुमार याचे वडील देवराज यांना कर्नाटक सरकारने आर्थिक मदत म्हणून २५ लाख रुपयांचा चेक सूपूर्त केला. यावेळी देवराज यांनी सांगितले की, या आर्थिक मदतीचा वापर ते त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी करणार आहेत. याचबरोबर देवराज यांनी काळजाला चटका लावणारे वक्तव्यही केले. ते म्हणाले, “मला २५ लाख रुपयांचा चेक मिळाला आहे, पण यामुळे माझा मुलगा परत येणार नाही.”
“मला २५ लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे, पण यामुळे माझा मुलगा परत येणार नाही. मी या पैशातील एक रुपयाही फायद्यासाठी वापरणार नाही. मी हे पैसे माझ्या मुलीच्या आणि तिच्या आईच्या खात्यात टाकेन. हे पैसे तिच्या भविष्यासाठी ठेवेन”, असे देवराज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
तत्पूर्वी, तुमकुरच्या उपायुक्त आणि जिल्हाधिकारी शुभा कल्याण यांनी सांगितले की, मृत मनोज कुमार याच्या वडिलांना मुख्यमंत्री मदत निधीतून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
“चिन्नास्वामी मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये तुमकुर जिल्ह्यातील मनोज कुमारचाही समावेश होता. आज, आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याचे वडील देवराज यांना २५ लाख रुपयांची मदत तातडीने देण्याचे आदेश मिळाले. आम्ही त्यांना मुख्यमंत्री मदत निधीतून धनादेश सुपूर्द केला आहे,” असे शुभा कल्याण यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.
जिल्हाधिकारी शुभा कल्याण यांनी पुढे सांगितले की, मृत तरुणाने कर्नाटक एसएसएलसी परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. तो अव्वल विद्यार्थी होता आणि नोकरीसाठी त्याला परदेशात जायचे होते.
“मनोज कुमारच्या वडिलांनी सांगितले की, मुलासाठी त्यांची खूप स्वप्ने होती. तो अव्वल विद्यार्थी होता आणि त्याने एसएसएलसी परीक्षेमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. मुलाला नोकरीसाठी परदेशात जायचे होते”, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर कर्नाटक सरकारने या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, या मदतीत आता वाढ करण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. त्यामुळे आता या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, “चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली मदत २५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. यापूर्वी सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती.”