Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते रमेश बिधुरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेत्याने पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल केलेलं विधान वादात सापडलं आहे. यावेळी बिधुरी यांनी आतिशी यांची तुलना हरिणीबरोबर केली आहे.

रमेश बिधुरी नेमकं काय म्हणाले?

“दिल्लीचे नागरिक रस्त्यांवर नरक भोगत आहेत… रस्त्यांचा परिस्थिती पाहिली आहे की… पण आतिशी कधीच लोकांना भेटायला आल्या नाहीत… पण आता निवडणुकीच्या काळात जसं जंगलात हरिणी धावते तसं दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे फिरत आहेत(दिल्ली की जनता नरक भोग रही है गलियों में… गलियों की हालत देखिये… कभी अतिशी नहीं गई मिलने लोगों से. लेकीन अब चुनाव के समय जैसे जंगल मे हिरनी भागती है वैसे अतिशी दिल्ली की सडकोपे हिरनी जैस भाग रही हैं)”, असे बिधुरी म्हणाले आहेत. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

२०१४ ते २०२४ पर्यंत दक्षिण दिल्लीतून लोकसभा खासदार राहिलेले बिधुरी यांना आता विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील कालकाजी येथून आतिशी यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे.

बिधुरी यांनी यापूर्वीही एका एका जाहीर सभेत बोलताना केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर टीका केली होती. “आतिशी आधी मार्लेना होत्या, आता त्या सिंह झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचा बापच बदलला. आतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूची फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी अफझल गुरूमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता”, असे रमेश बिधुरी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकेच नाही तर बिधुरी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधान केले होते. “मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन”, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या शब्दांमुळे जर माता-भगिनींना किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. मी महिलांचा आदर करतो. पण काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही त्यांच्या ढासळत्या राजकीय स्थितीकडे पाहिले पाहीजे”, असे बिधुरी म्हणाले.