भगव्या रंगाची जर्सी घालून टीम इंडियाचे खेळाडू खेळल्याने त्यांचा पराभव झाला असं वक्तव्य महबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. रविवारी इंग्लंड आणि भारत यांच्यात विश्वचषकातला सामना रंगला होता. या सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. ज्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री यांनी या पराभवाला भगव्या रंगाची जर्सी कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
Call me superstitious but I’d say it’s the jersey that ended India’s winning streak in the #ICCWorldCup2019.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) June 30, 2019
मला अंधश्रद्धाळू म्हटलात तरीही हरकत नाही मात्र भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली या आशयाचं ट्विट महबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. आत्तापर्यंत विश्वचषक सामन्यात भारताने एकही पराभव सहन केला नव्हता. रविवारी झालेल्या सामन्यात मात्र टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याला भगव्या रंगाची जर्सी कारणीभूत ठरली असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर काल भारताने सामना जिंकावा अशी इच्छा पाकिस्तानचे समर्थकही व्यक्त करत होते. काही समर्थकांनी तर भारताच्या विजयासाठी दुवाही मागितली. क्रिकेटच्या निमित्ताने का होईना दोन देश सोबत आहेत याबाबत चांगलं वाटतं आहे अशाही आशयाचं ट्विट त्यांनी केलं.
इंग्लंडने दिलेल्या ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने ३१ धावांनी सामन्यात बाजी मारत, उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे. मात्र भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे.
टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर अबू आझमी यांनीही आक्षेप घेतला होता. तसेच यावरून आरोप प्रत्यारोपही करण्यात आले होते. आता तर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनीच भगव्या रंगाच्या जर्सीमुळे भारताचा पराभव झाल्याचं म्हटलं आहे.