CDS Gen Anil Chauhan Speech in Pune: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. ७ मे रोजी मध्यरात्री भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. त्यानंतरही पुढच्या तीन दिवसांत पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. अखेर १० मे रोजी दुपारी पाकिस्तान व भारताचे डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यात चर्चा झाली आणि शस्त्रविराम जाहीर करण्यात आला. पण नेमकं पाकिस्तानने फोन का केला? यासंदर्भात सीडीएस अनिल चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल अनिल चौहान हे एका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवारी दुपारी पुणे विद्यापीठात उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी लष्करी कारवायंसंदर्भातल्या अनेक बाबींवर भाष्य केलं. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’चा विषय निघाला असता जनरल चौहान यांनी पाकिस्तानच्या त्या फोनकॉलसंदर्भात भूमिका मांडली.

“पाकिस्तानचं ४८ तासांचं नियोजन ८ तासांत उधळलं”

“पाकिस्ताननं १० मे रोजी मध्यरात्री १ वाजता जाहीर केलं होतं की भारताला ४८ तासांत गुडघे टेकायला लावणार. त्यानंतर त्यांनी सीमेपलीकडून हल्ले चालू केले. त्यांनी हा वाद आणखी चिघळवला. भारतानं फक्त तिथल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं होतं. पाकिस्ताननं ज्या लष्करी कारवाईसाठी ४८ तास सांगितले होते, ती मोहीम त्यांना अवघ्या ८ तासांत आटोपती घ्यावी लागली. त्यांनी लगेच फोन उचलला आणि शस्त्रविरामाची चर्चा केली”, असं जनरल अनिल चौहान म्हणाले.

“आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला त्याच दिवशी म्हणजे ७ मे रोजी पाकिस्तानला कळवलं होतं की तिथल्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आहे. पण जेव्हा पाकिस्तानकडून आव्हानात्मक भाषा वापरली जाऊ लागली, तेव्हा आम्हीही ठणकावलं की जर पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला, आमच्या लष्करी तळांवर हल्ला केला तर आम्हीही अधिक आक्रमकपणे त्यांच्यावर हल्ला करू”, असंही चौहान यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या ‘त्या’ फोनमागे दोन कारणं…

दरम्यान, सीडीएस अनिल चौहान यांनी पाकिस्तानकडून शस्त्रविरामासाठी आलेल्या फोन कॉलमागे दोन कारणं असू शकतात असं सांगितलं आहे. “पाकिस्तानबाबत बोलायचं झालं तर मी त्याबाबत दोन कारणं सांगू शकतो. एकतर त्यांना कदाचित हे लक्षात आलं असेल की जर त्यांनी अशाच कारवाया चालू ठेवल्या तर त्यांचं आणखी बरंच नुकसान होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्याकडे अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. पण त्यांना भारताच्या कोणत्या ठिकाणी आपण केलेल हल्ले खरंच विद्ध्वंस करू शकलेत की नाही, याचाच अंदाज लावता आला नाही. त्यामुळे त्यांनी अशी समजूत करून घेतली की आपण लक्ष्यभेद केला आणि त्यामुळे त्यांना वाटलं की आता चर्चा करायला हवी म्हणून त्यांनी फोन केला”, असं सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले.