“पाकिस्ताननं भारतात दहशतवादी कारवाया करता कामा नये. ‘ऑपरेशन सिंदूर’ मागचा मूळ विचार पाकिस्तानमधून होणारा राज्य पुरस्कृत दहशतवाद थांबवणे हा होता”, असं संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ते पुणे विद्यापीठात फ्यूचर वॉर अॅण्ड वॉरफेअर या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

“पहलगाममध्ये जे घडलं ते क्रूर होतं. डोळ्यांदेखत कुटुंबातील सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना धर्माच्या नावाखाली मारण्यात आलं. भारत सर्वाधिक दहशतवादी कृत्यांचा बळी ठरला आहे. आतापर्यंत जवळपास २० हजार लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत”, असंही ते म्हणाले.

सैन्यांनी चुका सुधारून पुढे जायला हवं

यावेळी त्यांनी सशस्त्र दलांना उद्देशूनही भाषण केलं. ते म्हणाले, “मला वाटतं की सैनिकांवर अपयश आणि नुकसानीचा परिणाम होत नाही. युद्धादरम्यान अडथळे आले तरीही मनोबल उंच राहिलं पाहिजे. काय चुकलं हे तुम्हाला कळलं पाहिजे, त्या चुका सुधारून पुढे जाता आलं पाहिजे. तुम्ही भीतीच्या छत्रछायेत राहता कामा नये”, असं अनिल चौहान यांनी म्हटलंय. तसंच, ऑपरेशन सिंदूरदरम्यान युद्ध आणि राजकारण समांतर पातळीवर सुरू होतं, अशी खंतही व्यक्त केली.

भारत दहशतीच्या सावलीत राहणार नाही

“भारत दहशतीच्या सावलीत राहणार नाही आणि आण्विक ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. दोन्ही राष्ट्रांनी (भारत आणि पाकिस्तान) वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे यात धोका होता हे स्पष्ट आहे. संघर्षादरम्यान नेहमीच जोखीम असते. पण तुम्ही जोखीम घेतली नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, असं म्हटलं जातं. आम्हाला माहित होतं की आमच्याकडे एक चांगली काउंटर-ड्रोन प्रणाली आहे”, असंही ते म्हणाले.

४८ तासांचा संघर्ष ८ तासांत गुंडाळला

“१० मे रोजी पहाटे १ च्या दरम्यान पाकिस्तानचा उद्देश भारताला गुडघ्यावर आणण्याचा होता. त्याकरता त्यांनी अनेक हल्ले केले. हे हल्ले करून त्यांनी दोन्ही देशांतील संघर्ष वाढवला. त्याबदल्यात आपल्याकडून फक्त दहशतवाद्यांनाच लक्ष्य करण्यात आलं होतं. जे ऑपरेशन ४८ तास सुरू राहिल असं म्हटलं जात होतं ते ८ तासांत गुंडाळण्यात आलं आणि आम्हाला फोन करत भारताबरोबर बोलायचं असल्याचं सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकाचा मृत्यू झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर सुमारे तीन चार दिवस दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला. हा संघर्ष ११ मे रोजी शस्त्रविरामानंतर थांबवण्यात आला.