Conspiracy to kill Arvind Kejriwal, AAP allegation against BJP & Delhi LG: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मारण्याचा भाजपाचा डाव असल्याचं आप खासदार संजय सिंग यांनी म्हटलं आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी भाजप आणि नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांना लक्ष्य केलं. तिहार तुरुंगात केजरीवाल यांची तब्येत खालावण्यासाठी भाजपाच जबाबदार आहे असं ते म्हणाले.

‘केजरीवाल मुद्दामहून गोड पदार्थ खात आहेत जेणेकरून त्यांची रक्तातली साखरेची पातळी वाढावी असं भाजपाचा आरोप होता’, असं सिंग म्हणाले. आता केजरीवाल यांनी खाणं कमी केलं असं त्यांचं म्हणणं आहे. कोणी असं करुन स्वत:च्या जीवाला धोका का निर्माण करेल? असा सवाल त्यांनी केला.

‘केजरीवाल यांचा वैद्यकीय अहवाल पाहता त्यांना तुरुंगात धोका आहे. त्यांना तिथे काहीही होऊ शकतं. केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचाच हा डाव आहे’, असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी केजरीवाल यांचा वैद्यकीय अहवालही दाखवला. त्यांच्या रक्तातल्या साखरेची पातळी ५०च्या खाली गेल्याचं त्यांनी दर्शवलं. ही पातळी ५०च्या खाली जाणं अतिशय धोकादायक मानलं जातं.

‘ज्या पद्धतीने भाजप नेते आणि नायब राज्यपाल केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत बोलत आहेत ते बघता केजरीवाल यांच्याविरोधातला हा कटच आहे’, असं सिंग म्हणाले. नायब राज्यपाल कार्यालय आणि दिल्लीचे मुख्य सचिव यांच्यात संवाद झाला. केजरीवाल मेडिकल डाएट घेत तसंच औषध घेत नसल्याबद्दल सक्सेना यांनी चिंता व्यक्त केली.

तिहार तुरुंग अधीक्षकांच्या अहवालानुसार अरविंद केजरीवाल यांनी स्वत:हूनच कमी कॅलरी मिळतील असा आहार घेतला आहे. घरी तयार केलेलं जेवण देण्यात येऊनही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी स्वेच्छेने कमी कॅलरी असणारे पदार्थ खाल्ले असं अहवालात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली मद्य धोरणासंदर्भात ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती. कनिष्ठ न्यायालयाने गेल्या महिन्यात त्यांना जामीन मंजूर केला. मात्र त्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र सीबीआयशी निगडीत केसमुळे ते अजूनही तुरुंगातच आहेत.