राजकीय नेते काहीही दावे करत असले, तरी काँग्रेस किंवा भाजप या दोघांनाही पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नसून देशाची आघाडी सरकारकडे वाटचाल सुरू आहे, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले.
जातीय आणि फूट पाडणाऱ्या शक्तींना नाकारण्यासाठी यूपीए सरकार आणण्याकडे देशाचा कल असल्याचेही सिद्धरामय्या म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे नेते बहुमताचा दावा करत असले, तरी ५४३ पैकी दीडशेहून अधिक जागा मिळण्याच्या स्थितीत कुठलाही पक्ष नाही असे निरीक्षण सिद्धरामय्या यांनी नोंदवले. कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (एस) हे सहकारी पक्ष लोकसभेच्या २८ पैकी २० मतदारसंघांत विजयी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. राज्यात मतदानाचा पहिला टप्पा १८ एप्रिलला होणार आहे.
काँग्रेस किंवा भाजप हे दोघेही संपूर्ण बहुमत मिळवण्याच्या परिस्थतीत नसल्याचे दिसते, मात्र यूपीए स्पष्ट मिळवेल असे सिद्धरामय्या यांनी प्रचारमोहिमेदरम्यान पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
देशात मोदी लाट नाही. याउलट, फुटीरवादी आणि जातीय शक्तींना नाकारण्याची लोकांमध्ये लाट असल्याचे दिसते. यामुळे एनडीएला दुसऱ्यांदा सत्ता मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. माझ्या मते, यूपीए पुरेशा जागा मिळतील आणि ती सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला येईल. स्वाभाविकच, इतर पक्ष तिच्याभोवती गोळा होतील. धर्मनिरपेक्ष मते विभाजित होऊ नयेत म्हणून महाआघाडी अस्तित्वात आली असल्याचे त्यांनी सांगितले.