Bads of Bollywood vs Sameer Wankhede Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईचे माजी झोनल संचालक आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांना समन्स जारी केले आहेत. ही याचिका शाहरुख खानचा मुलागा आर्यन खानने दिग्दर्शित केलेली नेटफ्लिक्सची वेब सिरीज द बॅड्स ऑफ बॉलिवूडशी संबंधित आहे. समीर वानखेडे यांचा दावा आहे की, या वेब सिरीजमध्ये त्यांची मानहानी करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर प्रतिवादींना सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

समीर वानखेडे यांच्या याचिकेत अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडसह नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांचे नाव आहे. बॅड्स ऑफ बॉलीवूड विरोधात कायमस्वरूपी मनाई आदेश आणि २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. याचबरोबर, नुकसानभरपाईची रक्कम कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करावी असेही म्हटले आहे.

“या वेब सिरीजमध्ये ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांचे दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण आहे, ज्यामुळे संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे”, असे वानखेडे यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित खटले मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित असतानाही, ही मालिका “जाणूनबुजून आणण्यात आली आहे”, असा युक्तिवाद त्यांनी केला.

समीर वानखेडे यांनी न्यायालयाला बॅड्स ऑफ बॉलीवूडचे स्ट्रीमिंग आणि वितरण रोखण्याची आणि त्यातील मजकूर बदनामीकारक घोषित करण्याची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या प्रकारच्या चित्रणामुळे ड्रग्ज कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांवरील जनतेचा विश्वासाला कमी होऊ शकतो.

आर्यन खान आणि २५ कोटींचे खंडणी प्रकरण

मे २०२३ मध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी आर्यन खानशी संबंधित २०२१ च्या क्रूझ जहाज ड्रग्ज चौकशीदरम्यान शाहरुख खानकडून २५ कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.