Shramishtha Mukherjee Meets PM Modi : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी शर्मिष्ठा मुखर्जींनी ‘प्रणब माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तकही भेट दिलं. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. माझ्या वडिलांशी असलेला त्यांचा आदर आजही कमी झालेला नाही या आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत.

शर्मिष्ठा मुखर्जींच्या पुस्तकात काय दावे आहेत?

“माझ्या वडिलांना (प्रणव मुखर्जी) यांना राहुल गांधी अनेकदा भेटायला येत असत. एकदा माझे वडील म्हणाले होते की राहुल गांधींच्या कार्यालयाला तर AM, PM यातला फरक समजत नाही मग अशात ते पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO चालवण्याची अपेक्षा कशी काय ठेवू शकतात? ” शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेलं हे पुस्तक ११ डिसेंबरला प्रकाशित झालं आहे.

पुस्तकात हा उल्लेख नेमक्या कुठल्या प्रसंगावर आहे?

शर्मिष्ठा मुखर्जी या पुस्तकात म्हणतात, “एके दिवशी सकाळी, मुगल गार्डन (आत्ताचं अमृत गार्डन) मध्ये प्रणव मुखर्जी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी राहुल गांधी त्यांना भेटायला आले. प्रणव मुखर्जींना मॉर्निंग वॉक आणि पूजा यात कुठलाही व्यत्यय आलेला चालत नसे. तरीही त्यांनी राहुल गांधींना भेटण्याचा निर्णय घेतला. याबाबत चौकशी केल्यावर त्यांना कळलं की राहुल गांधी आणि त्यांची भेट संध्याकाळी ठरली होती. मात्र राहुल गांधींच्या कार्यालयाने त्यांना सांगितलं की पूर्वनियोजित भेट सकाळी आहे. त्यांनी हा प्रसंग मला सांगितला आणि म्हणाले की राहुल गांधी यांच्या कार्यालयाला AM, PM यातला फरक कळत नाही तर मग ते पंतप्रधान कार्यालय चालवण्याची अपेक्षा किंवा स्वप्न कसं काय पाहू शकतात?”

प्रणव मुखर्जींनी काय म्हटलं आहे डायरीत?

प्रणव मुखर्जी यांच्या मुलीने केलेल्या दाव्याप्रमाणे प्रणव मुखर्जींनी त्यांच्या डायरीत हे देखील लिहिलं होतं की, “राहुल गांधी AICC च्या कार्यक्रमात आले नाहीत. ते का अनुपस्थित राहिले हे मला माहीत नाही. जेव्हा गोष्टी सहजपणे मिळतात तेव्हा त्यांची किंमत राहात नाही.” याचसह प्रणव मुखर्जींनीही हा देखील उल्लेख केला आहे की, “सोनिया गांधी आपल्या मुलाला (राहुल गांधी) उत्तराधिकारी करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. मात्र या युवकात (राहुल गांधी) राजकीय करीश्मा आणि राजकीय समज यांचा काही प्रमाणत अभाव आहे. काँग्रेसला ते पुन्हा उभारी देऊ शकतात का? लोकांना ते प्रेरित करु शकतात का? हे मला आज ठाऊक नाही.”

२०१३ मध्ये काय घडलं होतं?

सर्वोच्च न्यायालयाने दोषी सिद्ध झालेल्या आमदार आणि खासदारांना अपिल करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ न देताच अपात्र घोषित करण्याबाबत आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने अध्यादेश जारी केला होता. त्यावर राहुल गांधी संतापले. त्यांनी त्या अध्यादेशाची प्रत फाडली आणि फेकून दिली. तसेच या प्रकरणातील सरकारची भूमिका राजकीय आणि चुकीची असल्याची टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी बोलताना शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या होत्या, “राहुल गांधींनी विधेयक फाडून फेकल्याबाबतची माहिती मीच प्रणब मुखर्जींना दिली. त्यावर ते दुःखी होते. ते संतापले आणि त्यांचा चेहरा लाल झाला होता. त्यांनी ओरडून राहुल गांधी स्वतःला काय समजतात असं म्हटलं. मात्र, मला नंतर याची जाणीव झाली की, सैद्धांतिक पातळीवर प्रणब मुखर्जी राहुल गांधींशी सहमत होते.”