Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर केंद्र सरकार अलर्ट झालं असून पुन्हा अशा स्वरुपाच्या घटना घडू नये, यासाठी आता पावलं उचलले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच आता डीजीसीएने महत्वाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएच्या आदेशानुसार आता बोईंग ७८७ ड्रीमलायनर या विमानांची उड्डाणापूर्वी संपूर्ण सुरक्षा तपासणी अनिवार्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या या आदेशानंतर बोईंग ७८७ विमानांच्या अनिवार्य सुरक्षा तपासणी सुरु करण्यात आल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. त्यामुळे एअर इंडियाने विमानांच्या विलंबाचा इशारा देखील दिला आहे. डीजीसीएने निर्देशित केलेल्या सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत एअरलाईन्स असून पुढील ऑपरेशन्ससाठी परवानगी देण्यापूर्वी बोईंग ७८७ विमानांची ही तपासणी केली जात असल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जेनएक्स इंजिनने चालणाऱ्या सर्व ड्रीमलाइनर्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये विमानांच्या उड्डाणापूर्वी संपूर्ण सुरक्षा तपासणी, इंधन पॅरामीटर देखरेख आणि संबंधित सिस्टमची तपासणी, केबिन एअर कॉम्प्रेसर आणि संबंधित सिस्टमची तपासणी, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणाली चाचणी, हायड्रॉलिक सिस्टमची तपासणी, टेक-ऑफ पॅरामीटर्सची तपासणी करण्याचे निर्देश डीजीसीए दिले आहेत.

एअर इंडियाने काय म्हटलं?

डीजीसीएने दिलेल्या आदेशानंतर बोईंग ७८७ विमानांची सुरक्षा तपासणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुढील ऑपरेशन्ससाठी परवानगी देण्यापूर्वी बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्यातील विमानांची तपासणी भारतात परतताना केली जात आहे. एअर इंडियाने बोईंग ७८७ या विमानांपैकी नऊ विमानांची आतापर्यंत तपासणी पूर्ण केली आहे. तसेच उर्वरित २४ विमानांसाठी डीजीसीएने दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे या तपासणीसाठी वेळ वाढू शकतो आणि काही लांब पल्ल्याच्या मार्गांवर विशेषतः ऑपरेटिंग कर्फ्यू असलेल्या विमानतळांवर संभाव्य विलंब होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही विलंबाबद्दल ग्राहकांना योग्यरित्या सूचित केलं जाईल. तरी विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांना
http://airindia.com/in/en/manage/flight-status.html या संकेतस्थळावर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या व्यत्ययामुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांना एअर इंडिया रद्द केलेल्या विमानांचे संपूर्ण पैसे परत करत आहे. तसेच मोफत रीशेड्युलिंग ऑफर दिली जात आहे”, असं एअर इंडियाने एक्सवर म्हटलं आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घटनेबाबत काय म्हटलं?

नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, “१२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडियाचं विमान हे ६५० फूट उंचीवर गेलं होतं. मात्र, त्यानंतर ते विमान खाली आलं आणि अगदी एका मिनिटानंतर वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळलं. विमानाच्या पायलटने दुपारी १:३९ वाजता (१२ जून) एटीसीला मेडे कॉल केला होता. एटीसीनुसार जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अगदी एका मिनिटात रिप्लाय गेला होता पण तरीही प्रतिसाद मिळाला नाही. विमानतळापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळलं. तसेच १२ जून रोजी घडलेल्या अपघातापूर्वी याच विमानाने पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद सेक्टर उड्डाण कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केलं होतं”, असं समीर कुमार सिन्हा यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू काय म्हणाले?

“गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती अत्यंत कठीण होती. अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल माझ्या तीव्र संवेदना आहेत. या घटनेत ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत त्यांचं दुःख आणि वेदना मी समजू शकतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या निर्देशानुसार एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्याचं निरीक्षण सुरू आहे. भारतातील ३४ ड्रीमलाइनर्सपैकी आठ विमानांची आधीच तपासणी झाली आहे”, असं मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे.