Govind Raghuvanshi Meets Raja Raghuvanshi’s Family : इंदूरमधील रहिवासी राजा रघुवंशी याच्या मेघालयमधील शिलॉन्ग येथे झालेल्या हत्या प्रकरणाची देशभर बरीच चर्चा होत आहे. राजाची पत्नी सोनम हीच या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलीस आज तिला न्यायालयात हजर करणार आहेत. सोनमने तिचा प्रियकर (राज कुशवाह) व भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने तिचा पती राजा रघुवंशी याला ठार केल्याचं प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, सोनमच्या कुटुंबियांनी आज राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. सोनमचा भाऊ गोविंद हा राजा रघुवंशीच्या आईला भेटल्यानंतर ती धाय मोकलून रडत होती.
सोनमचा भाऊ गोविंद याने राजाच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तो म्हणाला, “मी स्वतः या हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करेन”. दरम्यान, सोनमचं राज कुशवाहबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या बातम्या गोविंदने फेटाळल्या आहेत.
सोनमला फाशी व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन : गोविंद रघुवंशी
गोविंद रघुवंशी म्हणाला, “राज कुशवाह हा आमच्या कंपनीत कर्मचारी होता. त्याचं आणि सोनमचं प्रेमप्रकरण नव्हतं. सोनम त्याला भाऊ मानायची, राजही तिला दिदी म्हणायचा. सोनम त्याला राखी बांधायची. या प्रकरणात आमच्याकडून जी काही मदत होऊ शकते ती सर्व प्रकारची मदत आम्ही करू. मी सोनमविरोधात सर्व काही आवश्यक कारवाई करेन. कारण राजा हा माझा खूप जवळचा मित्र होता. सोनम या प्रकरणात दोषी असेल तर मी तिच्या फाशीच्या शिक्षेची तजवीज करेन”.
सोनमचा भाऊ म्हणाला, “सोनम असं काहीतरी करणार असल्याची मला थोडी जरी कुणकुण लागली असती तरी मी राजाला वाचवलं असतं. राजा हा आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच होता. मी स्वतः राजासाठी न्यायालयात वकील उभा करणार आहे. मी सोनमविरोधात लढणार आहे. माझं आणि सोनमचं नातं आता संपुष्टात आलं आहे”.
नेमकं प्रकरण काय?
इंदूरमधील राजा रघुवंशी व सोनम रघुवंशी या दोघांचं ११ मे रोजी लग्न झालं होतं. त्यानंतर २० मे रोजी दोघेही मेघालयमधील शिलॉन्ग येथे मधुचंद्रासाठी गेले होते. मात्र २३ मेपासून दोघांचाही त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क बंद झाला. दोघेही बेपत्ता असावेत किंवा त्यांचं अपहरण झालं असावं अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यानंतर २ जून रोजी शिलॉन्गमधील एका दरीत राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडला. तेव्हा सोनमचं अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र ९ जून रोजी सोनम पोलिसांना शरण आली. प्राथमिक तपासात सोनमनेच राजाच्या खूनाचा कट रचल्याचं समोर आलं आहे.