सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्याने गोळी घातल्याने गंभीर जखमी झालेल्या गुरुग्राममधील न्यायाधीशांच्या 19 वर्षीय मुलाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. जखमी झाल्याने रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. 13 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. धक्कादायक म्हणजे भररस्त्यात त्यांचे मृतदेह तसेच ठेवून आरोपी पोलिसाने गाडीतून पळ काढला होता. मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्दय, यकृत आणि किडनी दान करण्यात आलं आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश कृष्णन कांत यांच्या पत्नी आणि मुलावर आरोपी माहिपाल सिंह याने 13 ऑक्टोबरला गोळीबार केला होता. आई आणि मुलगा सेक्टर ४९ मध्ये औषधांच्या खरेदीसाठी गेलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 38 वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला होता. तर मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.

धक्कादायक! सुरक्षारक्षकानेच न्यायाधीशाची पत्नी आणि मुलावर केला गोळीबार

घटनेनंतर काही वेळातच आरोपी माहिपालला अटक कऱण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. गेल्या चार वर्षांत त्याने अनेक अधिकाऱ्यांकडे वैयक्तित सुरक्षारक्ष म्हणून तो तैनात होता. न्यायाधीशांसाठी गेल्या दोन वर्षांपासून तो काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात आरोपी माहिपालने हे कृत्य केलं होतं. न्यायाधीशांची पत्नी रितू आणि मुलगा ध्रुव यांना खरेदी झाल्यानंतर माहिपाल सापडत नसल्याने खूप सुनावलं होतं. यावरुनच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने दोघांवर गोळीबार केला.