Operation Sindoor Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग गडद झालेले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने पहलगामला हल्ला केल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय. दरम्यान, आताही भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र डागून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इंडिया गेट परिसर रिकामा करण्यात आला आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी केला आहे. दरम्यान, ७ मे नंतर आता पुन्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून सीमेपलीकडून हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापतींना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जातंय. भारताने आता पुन्हा पाकिस्तानचे दोन लढाऊ विमाने पाडली आहेत. दरम्यान, राजस्थान आणि पंजाबमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आलं असून राजधानी दिल्लीतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने इंडिया गेट रिकामी करण्यात आला असून तेथील वाहतूकही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरातून निघून जाण्याच्या घोषणा दिल्ली पोलीस देत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
तसंच, दिल्लीतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एका आदेशात, सेवा विभागाने म्हटले आहे की, “सध्याची परिस्थिती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची तयारी लक्षात घेता, सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत की पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला रजा दिली जाणार नाही .” यामध्ये दिल्ली सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
तसंच, शहरातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (डीएम) शुक्रवारपर्यंत राजधानीत हवाई हल्ल्याचे सायरन बसवण्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर सध्या एक यंत्रणा आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत, द्वारका, उत्तम नगर, नजफगड आणि कापशेरा येथे इलेक्ट्रिकल आणि मॅन्युअल सायरन दोन्ही बसवण्यात आले होते.