Indore Couple Missing : लग्न हा माणसाच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा संस्कार मानला जातो. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्नं सगळेच रंगवतात. तसंच लग्नानंतर मधुचंद्रासाठी जाणं ही नवविवाहित दाम्पत्याने एकमेकांना जाणून घेण्यासाठीचीच एक सहल असते. मधुचंद्राच्या सुखद आठवणी नवविवाहितांच्या मनावर कायमच कोरल्या जातात. मात्र मध्य प्रदेशातल्या इंदूर मध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम यांच्याबाबतीत जे घडलं त्यासाठी दुर्दैवी हा शब्दही छोटा आहे. २० मे रोजी शिलाँगला मधुचंद्रासाठी गेलेलं जोडपं २३ मे रोजी बेपत्ता झालं. त्यानंतर राजा आणि सोनम यांचा शोध सुरु होता. अखेर २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खोल दरीत आढळून आला. हे जोडपं बेपत्ता झाल्यापासून काय घडलं? जाणून घेऊ.

राजा आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी झाला, २० मे रोजी दोघं मधुचंद्रसाठी गेले होते

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न सोनमशी झालं. ११ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हे दोघंही सुरुवातीला बंगळुरुला गेले. त्यानंतर बंगळुरुमार्गे हे दोघंही गुवाहाटीला गेले. गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. २० ते २२ मे या कालावधीत राजा आणि सोनम दोघंही त्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात होते. २३ मे रोजी आम्ही शिलाँगला जात आहोत तिथून फोन करतो असं या दोघांनीही कुटुंबाला सांगितलं होतं. मात्र शिलाँगला ते दोघंही गेल्यापासून त्यांचा संपर्क तुटला. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवतं होतं. या दोघांनीही शिलाँगमध्ये फिरण्यासाठी भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशीही माहिती समोर आली. २३ मेच्या दिवशी काहीही संपर्क झाला नाही. तसंच २४ मे रोजीही काही संपर्क झाला नाही. त्यामुळे राजा आणि सोनम दोघांच्याही कुटुंबांची काळजी वाढली. शिलाँग या ठिकाणच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी हे दोघं गेले होते अशी माहिती त्यांनीच दिली होती. पर्वतरांगांमध्ये मोबाइलला रेंज नसेल असं दोघांच्या कुटुंबाला वाटलं होतं. पण दोन दिवस संपर्क न झाल्याने राजा आणि सोनम दोघांच्याही कुटुंबांची चिंता वाढली.

२४ मे रोजी राजा आणि सोनम यांचे भाऊ शिलाँगला रवाना

२४ मे रोजी तातडीने सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन हे दोघंही शिलाँगला रवाना झाले. गुगल मॅपवर त्यांनी पाहिलं की या दोघांचं शेवटचं लोकेशन शिलाँगच्या पर्वतरांगांमध्ये दाखवतं आहे. गोविंद आणि विपिन या दोघांनी राजा आणि सोनमला ज्या माणसाने अॅक्टिव्हा भाड्याने दिली होती त्या माणसाचीही माहिती काढली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांनी जी अॅक्टिव्हा वापरली ती शिलाँगच्या पर्वतरागांमध्ये सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी ही अॅक्टिव्हा सापडली त्या भागात एक रिसोर्ट आहे. ते रिसोर्ट गुन्हेगारी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे अशीही माहिती समोर आली.

२४ मे ते २ जून या कालावधीत सुरु होतं शोधकार्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर दोघांच्याही घरच्यांची चिंता आणखी वाढली. पण हे दोघंही बेपत्ता झाले असतील असं समजून या दोघांच्या भावांनी आणि पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु ठेवला. अखेर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह १५० फूट खोल दरीत सापडला. ज्या ठिकाणी या दोघांनी वापरलेली अॅक्टिव्हा सापडली होती तिथून साधारण २५ किमी अंतरावर राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. राजाची पत्नी सोनम मात्र अजूनही बेपत्ता आहे, तिचा शोध पोलीस घेत आहेत.

Sonam and Her Husband Raja Raghuvanshi News
हनीमूनला गेलेलं जोडपं बेपत्ता, राजा रघुवंशीचा मृतदेह कसा सापडला? (फोटो- PTI)

राजा रघुवंशीचा मृतदेह कसा मिळाला? ओळख कशी पटली?

११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांच्या ड्रोनला दिसला. हा मृतदेह १५० फूट खोल दरीत होता. तसंच मृतदेह इतका सडला होता की त्याची ओळख पटवणं कठीण होतं. अखेर या मृतदेहाच्या हातावर राजा हे नाव गोंदलेलं होतं त्यावरुन त्याच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. राजाची पत्नी सोनम अद्यापही बेपत्ता आहे. सोनम कुठे आहे? राजाचा मृत्यू कसा झाला? हे सगळे प्रश्न अद्यापही कायम आहेत. पोलिसांना राजाचा मृतदेह इस्ट खासी हिल्स भागात सापडला. ही हत्या असावी असाही संशय पोलिसांना आहे. २३ मे रोजी हे जोडपं बेपत्ता झाल्यापासून पोलीस, एसडीआरएफ, गिर्यारोहण क्लबतर्फे या दोघांचा शोध सुरु होता. अजूनही राजाच्या पत्नीचा शोध सुरु आहे. ज्या ठिकाणी ही शोध मोहीम राबवली जात होती त्या ठिकाणी वातावरणात सारखे बदल होत होते. पाऊस पडणं, उन पडणं, पुन्हा पाऊस पडणं या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. २ जूनला पोलिसांच्या ड्रोनने १५० फूट खोल दरीत एक मृतदेह आहे हे शोधलं. हा भाग दुर्गम असल्याने या ठिकाणी मृतदेह काढण्यासाठीही बराच वेळ लागला. २ जूनच्या दिवशी दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान हा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला.

मृतदेहाजवळ पोलिसांना काय काय सापडलं?

राजा रघुवंशीचा मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्याच्या हातावरील राजा या टॅटूवरुन त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. Pentra 40 या गोळ्यांचं पाकीट, एका महिलेचा पांढरा शर्ट, मोबाइलच्या एलईडी स्क्रीनचा एक भाग सापडला. तसंच राजा रघुवंशीच्या मृतदेहाच्या डाव्या मनगटावर एक स्मार्ट वॉच सापडलं. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी हा घातपात तर नाही ना? या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. अमर उजालाने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Body Of Indore Man, On Honeymoon In Meghalaya, Found
हनिमूनला शिलाँगला गेलेल्या जोडप्यापैकी ृराजा रघुवंशीचा मृतदेह आढळला. त्याच्या पत्नीचा म्हणजेच सोनमचा शोध घेतला जातो आहे. (फोटो सौजन्य- @Prakharshri78 DD News)

राजाचा मृतदेह पूर्णपणे सडला होता, पोलिसांची माहिती

राजाचा मृतदेह पूर्णपणे सडला होता आणि त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती. तरीही पोलिसांनी दोऱ्यांच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर काढला. शिलाँग येथील सरकारी रुग्णालयाच्या शवागारात हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. आता नेमकं राजाच्या मृत्यूचं कारण काय? हे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावरच समजू शकणार आहे. या घटनेमुळे राजा रघुवंशीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजाचा मोबाइल, त्याच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी आणि पैशांचं पाकीट या वस्तू पोलिसांना सापडलेल्या नाहीत. इंदूरहून बाहेर जात असताना या सगळ्या गोष्टी राजाजवळ होत्या. रघुवंशी कुटुंबाने हे म्हटलं आहे की राजाची हत्या झाली असावी कारण ज्या परिस्थितीत मृतदेह मिळाला आहे ती बाब अपघाती मृत्यूची वाटत नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत असं म्हटलं आहे. पोलिसांनी अद्याप ही हत्या आहे की नाही याबाबतही काही अंदाज वर्तवलेला नाही. राजा आणि सोनम या दोघांच्या बॅगा त्यांनी जे होम स्टे घेतलं होतं तिथे मिळाल्या आहेत. त्या ठिकाणीही राजाची चेन, मोबाइल, पाकिट या वस्तू नाहीत. स्थानिकांचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. आता सोनमचं काय झालं? तिचा तपास लागतो का? ती जिवंत असेल का? ती जिवंत असेल तर तिने संपर्क का केला नाही? हे प्रश्न अद्याप कायम आहेत. आता सोनमचा शोध लागला तरच नेमकं काय घडलं हे समजू शकणार आहे. नवविवाहितांसाठी मधुचंद्र हा स्मरणात राहणारा ठरत असतो. मात्र राजा आणि सोनमच्या आयुष्यातला हा मधुचंद्रच राजाच्या मृत्यूची भयाण आठवण देणारा ठरला आहे.