इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) विरोधात देशभरातील विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू आहे. ‘आयसीएआय’कडून सीए परीक्षेच्या उत्तरपत्रिका योग्यरित्या तपासण्यात येत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिल्लीसहित अन्य राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

गेल्या महिन्यात सीए फायनलचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात गडबड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. याविरोधात हरकत घेण्याचा अधिकारदेखील आपल्याला नसल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पारदर्शक पद्धतीनं उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात तसंच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी योग्य प्रणाली राबवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याविरोधात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर #dearicaipleasechange या नावाने मोहिमदेखील सुरू केली आहे.

आयसीएआय सीएच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका योग्यरित्या तपासत नसल्याची प्रतिक्रिया दिल्लीत शिकणाऱ्या प्रतिक वालिया यानं दिली. निकालानंतर विद्यार्थ्यांनी जेव्हा आपल्या उत्तरपत्रिका पाहण्यासाठी मागितल्या त्यावेळी ५०० पेक्षा अधिक उत्तरपत्रिका योग्यरित्या तपासण्यात आल्या नसल्याचं निदर्शनास आलं. प्रश्नांची उत्तर योग्यरित्या लिहिल्यानंतरही त्यांना कमी गुण देण्यात आले होते. तसंच फेरतपासणीची सुविधाही उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं तो म्हणाला.

तर राजस्थानमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनं या परीक्षांच्या उत्तरपत्रिका प्रॅक्टिस करणारे सीए तपासत असल्याचं सांगितलं. तसंच या उत्तरपत्रिका तपासताना आयसीएआयद्वारे कोणतही निरिक्षण केलं जात नाही. अनेकदा उत्तरपत्रिका तपासणारे सीए स्वत:च आपल्याकडे आर्टिकलशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका तपासून घेत असल्याचे तो म्हणाला. सध्या देशभरातील अनेक विद्यार्थी याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.