India-Pakistan Ceasefire Donald Trumps Claims: रवांडा आणि काँगोने नुकतेच अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत ३० वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबवत ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान, इराण-इस्रायल आणि इतर विविध देशांमध्ये शांतता प्रस्थापित केली असल्याचा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा दावा केला की, त्यांनीच भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केली होती. ते म्हणाले की, “काही महिन्यांतच, आपण भारत आणि पाकिस्तान, इस्रायल आणि इराण, डीआरसी आणि रवांडा व इतर काही देशांमध्ये शांतता प्रस्थापित केली आहे.”
ते खूप शक्तिशाली अणुशक्ती असलेले देश आहेत
“जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानकडे पाहिलं, तर त्यांच्यात एक मोठा संघर्ष सुरू होता. पण त्यांच्या महान नेत्यांनी संघर्ष थांबवला. प्रत्येकाने पाहिलं असेल की परिस्थिती खूप वाईट होणार होती. ते अणुशक्ती असलेले देश आहेत, खूप शक्तिशाली अणुशक्ती असलेले देश आहेत,” असे ट्रम्प यांनी पुढे म्हटले.
आपल्या देशाचा पुन्हा आदर करू लागले
यावेळी ट्रम्प यांनी असेही म्हटले की, “जगभरात शांतता करार साध्य करण्यासाठी त्यांच्या प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक वाटते. जागतिक नेते आपल्या देशाचा पुन्हा आदर करू लागले आहेत, म्हणून हे शक्य झाले. काही महिन्यांपूर्वी आपण असा देश नव्हतो, ज्याचा आदर केला जात असे. एका वर्षापूर्वी आपल्या देशाला एक अक्षम राष्ट्राध्यक्ष होता. या डेस्कभोवती, या सुंदर रिझोल्युट डेस्कभोवती वाईट लोक फिरत होते.”
केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दावा करत आहेत की, त्यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केली आहे. ट्रम्प सातत्याने करत असलेल्या या दाव्यामुळे भारतात गोंधळ निर्माण झाला आहे.
ट्रम्प यांनी म्हटले होते की, गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान त्यांनी शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केली. भारतात काँग्रेस सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारत आहे. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, शस्त्रविरामामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती.