भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असून एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे  जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील करोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी करोनावर मात केली आहे.

जगभरातील प्रत्येक देशात करोना महामारीचा विळखा आहे. करोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत एक लाख ९४ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकानंतर ब्राझिलमध्ये एक लाख ३१ हजार जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात ७९ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.