‘‘जगाच्या नकाशावर आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर पाकिस्तानने आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने दाखवलेला संयम भविष्यात लष्करी संघर्षाच्या बाबतीत पुन्हा दाखवला जाणार नाही. शेजारील राष्ट्राचे अस्तित्वच नष्ट करू,’’ असा कडक इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी दिला. भारतीय सैनिकांना कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहनही लष्करप्रमुखांनी केले.
राजस्थानच्या सीमावर्ती भागांना भेट देताना जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला. श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे सैनिकांशी त्यांनी संवाद साधला. एक देश म्हणून भारत आता पूर्णपर्ण सज्ज आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान दाखवलेला संयम आता दाखवणार नाही. या वेळी आपण एक पाऊल पुढे टाकू आणि अशा पद्धतीने कृती करू की जगाच्या नकाशावर राहायचे की नाही याचा विचार पाकिस्तानला करण्यास भाग पाडू, असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानमध्ये दहशतवादी अड्डे असल्याचे पुरावे भारताने जगाला दिले. भारताने हे पुरावे शोधून काढले नसते तर पाकिस्तानने ते सर्व लपवले असते. या लष्करी मोहिमेत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर हल्ला केला, त्यापैकी सात ठिकाणांवर लष्कराने आणि दोन ठिकाणी हवाई दलाने हल्ला केला. पाकिस्तानातील सामान्य नागरिकांविरोधात नव्हे तर केवळ दहशतवाद्यांनाच हानी पोहोचवायची होती, म्हणून दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ला करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.
पाकिस्तानची विमाने उद्ध्वस्त – हवाई दलप्रमुख
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानी सैन्यदलाची विमाने उद्ध्वस्त केल्याची तपशीलवार माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी दिली. पाकिस्तानमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये एक सी-१३० विमान, एक एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमान आणि तळांवर थांबवण्यात आलेली चार ते पाच ‘एफ-१६एस’ प्रकारातील लढाऊ विमाने उद्ध्वस्त करण्यात आली, असे हवाई दलप्रमुखांनी सांगितले. एफ-१६ आणि जेएफ-१७ प्रकारातील पाच प्रगत लढाऊ विमानेही नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.