India-Pakistan Tensions: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने सातत्याने भारताच्या सीमेलगताच्या शहरांवर ड्रोनसह विविध माध्यमांतून हल्ले करण्याचे प्रयत्न केले. पण, भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परातवून लावले. असे असले तरी पाकिस्तानच्या या हल्ल्यांत भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले आहेत. यामध्ये २५ पंजाब रेजिमेंटचे सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल शहीद झाले. ते ऑगस्ट २०२५ मध्ये लष्करातून निवृत्त होणार होते.
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ येथे शनिवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात २५ पंजाब रेजिमेंटचे सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल शहीद झाले. ५० वर्षीय जरीयाल यांनी काही महिन्यांपूर्वी सीमावर्ती शहराला त्यांची शेवटची पोस्टिंग म्हणून निवडले होते. ते ३१ ऑगस्ट रोजी सैन्यातून निवृत्त होणार होते.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर फक्त एकदाच बोललो
सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल यांचे वडील गराजसिंग जरीयाल यांनी सांगितले की, ३२ वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांचा मुलगा तीन महिन्यांत सैन्यदलातून निवृत्त होणार होते. “काही महिन्यांपूर्वीच, जेव्हा त्यांना त्यांची शेवटची पोस्टिंग निवडण्याचा पर्याय देण्यात आला तेव्हा त्यांनी सीमावर्ती शहरात पोस्टिंग निवडले. आम्ही सर्वजण त्यांच्या परतीची योजना आखत होतो, पण ते तिरंग्यात गुंडाळून घरी येतील असे कोणालाही वाटले नव्हते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर मी त्यांच्याशी फक्त एकदाच बोललो होतो. त्यांनी सांगितले होते की, ते बंकरमध्ये राहत आहेत”, असे २५ पंजाब रेजिमेंटमधून हवालदार म्हणून निवृत्त झालेले गराजसिंग यांनी सांगितले.
सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल यांच्या पश्चात आईवडील, पत्नी सुषमा देवी, मुलगा अभिषेक (२२) आणि मुलगी अनामिका (२१) असा परिवार आहे.
भारत-पाकिस्तान शस्त्रविराम
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानने “पूर्ण आणि तात्काळ” शस्त्रविरामास सहमती दर्शवली आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होते. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनीही अधिकृत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली होती.
असे असले तरी, पंजाबमधील अमृतसर, फिरोजपूर, बर्नाला, पठाणकोट, भटिंडा आणि संगरूरसह अनेक शहरांमध्ये काल रात्रीही ब्लॅकआउट लागू करण्यात आले होते. काही जिल्हा प्रशासनांनी सावधगिरीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलल्याचे म्हटले होते.
गुजरातच्या कच्छमध्ये, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी “अनेक ड्रोन दिसले” असल्याची माहिती देत पूर्णपणे ब्लॅकआउटची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी नागरिकांना लोकांना घाबरू नका असे आवाहन केले.