आपल्या देशाच्या दोन खलाशांविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याचा वापर करण्याच्या कृतीला इटालीच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कृतीमुळे इटाली हे दहशतवादी राष्ट्र असल्याची प्रतिमा तयार होते, असे इटाली सरकारचे म्हणणे आहे.
केरळच्या तटवर्ती क्षेत्रात दोघा भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा इटालीच्या दोघा खलाशांवर आरोप आहे. सदर खटल्याची सुनावणी शीघ्रगतीने करावी, अथवा खटल्यास विलंब झाल्याने दोघा खलाशांना आरोपमुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला द्यावेत, अशी याचिका करण्यात आली असून त्यावर २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
या खलाशांविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याचा वापर करण्याच्या कृतीलाही याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या खलाशांविरुद्ध मेरिटाइम झोन, भादंवि, फौजदारी दंड संहिता आणि अन्य कायद्यान्वये कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती, असेही इटाली सरकारने म्हटले आहे.