भाजपाचे वरिष्ठे नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. (Bharat Ratna Lal Krishna Advani) देशातला सर्वात मोठा नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार. हा पुरस्कार हा जाहीर झाला आहे. ही घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. एक काळ असा होता ज्या काळात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची जोडी हे देशभरात गाजलेली जोडी होती. या जोडीमुळेच देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकारही स्थापन होऊ शकलं. लालकृष्ण आडवाणी यांना राम मंदिराच्या रथयात्रेचं श्रेय तर जातंच पण राजकारणात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची मैत्री कायमच चर्चेत राहिली. (Latest News) लालकृष्ण आडवाणी यांनी राजकारणात सुरु केलं 'यात्रा कल्चर' लालकृष्ण आडवाणी हे असे नेते आहेत ज्यांनी राजकारणात यात्रांची संस्कृतीच एक प्रकारे रुजवली. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे ही मागणी जेव्हा सातत्याने होत होती तेव्हा लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून अयोध्येपर्यंत रथायात्रा काढली होती. ज्यानंतर देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचं राजकारण उदयाला आलं. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी समस्तीपूरमध्ये लालकृष्ण आडवाणी यांना अटक केली. या निर्णयामुळे लालकृष्ण आडवाणी आणि लालूप्रसाद यादव हे दोघंही त्या काळातले चर्चेतले चेहरे ठरले होते. आडवाणी आणि वाजपेयी यांची जोडी शुद्ध आणि संस्कृत शब्दांचा साज असलेली हिंदी भाषा बोलण्यासाठी लालकृष्ण आडवाणी ओळखले जातात. त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं की वयाच्या २० व्या वर्षापर्यंत त्यांना हिंदी नीट बोलता यायचं नाही. त्या काळात ते अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणं ऐकत. या दोघांची मैत्री खूप गहिरी होती. लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा त्यानंतर त्यांना झालेली अटक या सगळ्यानंतर लालकृष्ण आडवाणी हेच भाजपाची सत्ता आल्यावर पंतप्रधान होतील अशा चर्चा होत्या. मात्र त्यावेळी भाजपाचं मुंबईतलं जे अधिवेशन पार पडलं त्यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयींचं नाव जाहीर केलं आणि त्यावेळी हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का ठरला होता. भारतीय जनता पार्टीला बळ देण्यात लालकृष्ण आडवाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. जेव्हा आडवाणी यांनी वाजपेयींचं नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं तेव्हा लालकृष्ण आडवाणी हे भाजपाचे अध्यक्ष होते. हे पण वाचा- मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांची पहिली भेट कशी झाली होती? अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची पहिली भेट कशी झाली तो किस्साही रंजक आहे. अटल बिहारी वाजपेयी एकदा पंडित श्यामा प्रसाद मुखर्जींसह ट्रेनने मुंबईला चालले होते. काश्मीरचा प्रश्न उपस्थित करुन त्यावेळी मुखर्जींनी देशाचा दौरा सुरु केला होता. त्यावेळी कोटा या ठिकाणी आडवाणी प्रचारक म्हणून काम करत होते. त्यावेळी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीच लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घालून दिली होती. त्यावेळी झालेली मैत्री ही नंतर इतकी घट्ट मैत्री झाली की या दोघांच्या मैत्रीची चर्चा देशभरात होऊ लागली. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.