नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर, ‘‘लोकशाही आणि आपल्या राज्यघटनेचे हुकूमशाहीपासून संरक्षण करण्याची ही कदाचित अखेरची संधी आहे’’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून शनिवारी व्यक्त करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’वर लिहिले की, देशातील लोक द्वेष, बेरोजगारी आणि महागाईविरोधात लढतील. हेही वाचा >>> निवडणूक रोख्यांचा ‘डोस’ कधी, कुणाला? खरगे यांनी लिहिले की, ‘‘२०२४च्या लोकसभा निवडणुका भारतासाठी ‘न्यायाचे दरवाजे’ उघडतील. हुकूमशाहीपासून लोकशाही आणि आपल्या राज्यघटनेचे संरक्षण करण्याची ही कदाचित शेवटती संधी असेल. आम्ही भारताचे लोक द्वेष, लूटमारी, बेरोजगारी, महागाई आणि अत्याचारांविरोधात लढा देऊ’’. निवडणूक रोख्यांच्या घोटाळयाचे ढग, विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना तुरुंगवास, निलंबन आणि छापे, मुख्य विरोधी पक्षाचे निधी गोठवणे अशा अभूतपूर्व परिस्थितीत निवडणुका होत आहेत, असे काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा पत्रकार परिषदेत म्हणाले. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘ही निवडणूक म्हणजे मैलाचा दगड आहे कारण या निवडणुकीमुळे आपल्या लोकशाहीचे संरक्षण होईल की नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचे संरक्षण होईल की नाही, की एका माणसाच्या लहरीनुसार आपल्या लोकशाहीची दिशा आणि भवितव्य ठरेल हे निश्चित होणार आहे. ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे’’. ते पुढे म्हणाले की, ‘‘आम्ही शेतकरी, तरुण आणि महिलांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत आहोत. विशेषत: राहुल गांधी यांनी काढलेल्या दोन यात्रांदरम्यान तरुणांमधील बेरोजगारीचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. भारताचे राजकारण या विषयावर केंद्रित राहणे आवश्यक आहे. लोक या निवडणुकीची प्रतीक्षा करत होते’’.