Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यामुळे या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं बंगळुरूत जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र, यावेळी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली आणि या कार्यक्रमाला गालबोट लागलं. या विजयी परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ‘रायल चॅलेंज बंगळूरु’(आरसीबी), कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) संस्था आणि ‘कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन’च्या (केएससीए) प्रतिनिधींच्या अटकेचे निर्देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते. यानंतर आता कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारने शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या बरोबरच या संपूर्ण घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे.

बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई करत आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरसीबी व्यवस्थापनाचे निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएचे सुनील मॅथ्यू यांच्यासह आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

पोलिसांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी व कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) प्रशासनाविरुद्ध चेंगराचेंगरीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच केएससीएचे अधिकारी फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाने या चेंगराचेंगरीच्या घटनेची स्वतःहून दखल घेत राज्य सरकारला १० जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं होतं की, “उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून या घटनेची चौकशी करण्यात येईल. तसेच नियोजन, समन्वय आणि गर्दी व्यवस्थापनातील त्रुटींची चौकशी करण्यात येईल आणि ३० दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं घटना कशी घडली?

आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत तब्बल ४७ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.