Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुरादाबाद परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने माकडांना घाबरवण्यासाठी कुऱ्हाड फेकून मारली. मात्र, ही कुऱ्हाड माकडांना लागण्याऐवजी चुकून त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला लागली आणि त्यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या २ वर्षांच्या मुलावर माकडे हल्ला करतील अशी भिती वडिलांना होती. त्यामुळे त्यांनी माकडांना पळून लावण्यासाठी जवळ पडलेली कुऱ्हाड फेकून मारत माकडांना पळून लावण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांनी माकडांवर फेकलेली कुऱ्हाड मुलाला लागली आणि त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत संबंधित व्यक्तीच्या मेहुण्याने गंभीर आरोप केला आहे. मुलाच्या वडिलांनी रागाच्या भरात मुलाची हत्या केल्याचा दावा मेहुण्याने केला आहे. या संदर्भातील वृ्त्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
झालं असं की, दोन वर्षांचा हा मुलगा घरात खेळत होता. पण तेव्हा काही माकडे त्या ठिकाणी आले. त्यामुळे दोन वर्षांच्या मुलाचे वडील लखन यांना वाटलं की आपल्या मुलावर माकडे हल्ला करतील. त्या भीतीमुळे लखन हे घराच्या छतावर गेले आणि माकडांना हाकलून लावण्यासाठी कुऱ्हाड फेकली. पण दुर्दैवाने ती कुऱ्हाड त्यांच्या आरव नावाच्या दोन वर्षांच्या मुलाच्या मानेवर लागल्याने मान कापली गेली आणि त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला.
जेव्हा मुलाच्या गळ्यावर कुऱ्हाड लागली तेव्हा आरव मोठ्याने रडू लागला. त्यानंतर घटनास्थळी कुटुंबातील सर्वजणांनी धाव घेतली. त्यानंतर त्याला जवळच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. मात्र, तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण या घटनेची माहिती कुटुंबाने पोलिसांना दिली नसल्यामुळे नातेवाईकांना हत्येचा संशय निर्माण झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, लखन यांचे मेहुणे जितेंद्र यांनी आरोप केला की हा अपघात नाही तर खून होता. जितेंद्र यांच्या मते लखनने त्याची पत्नी अनिताशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात ही हत्या केली आहे. तसेच तिलाही मारहाण केल्याचा दावा जितेंद्र यांनी केला आहे. भांडणाच्या वेळी लखनने आरवला घेऊन जात ठार केल्याचा संशय त्यांना असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.