बिहारमध्ये राजकीय घडामोडी वेग आला आहे. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी भाजपासोबत काडीमोड करून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना दिला आहे. नितीशकुमार यांच्या या निर्णयामुळे येथे नवे सत्तासमीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द नितीशकुमार यांनी दिले आहेत. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) तसेच अन्य मित्रपक्षांसोबत महागठबंधन करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा >> नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; बिहारमध्ये भाजपाला दुसरा धक्का

“मी राज्यपालांची भेट घेऊन माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महागठबंधनमध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार आहोत. या सर्व आमदारांच्या समर्थनाचे पत्र आम्ही राज्यपालांना सोपवले आहे. तसेच सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कधी असेल, याची माहिती राज्यपाल देणार आहेत,” अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा >> सत्ताकारण : महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!

दरम्यान, नितीश कुमार यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याआधी भाजपासोबतच्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंगळवारी (९ ऑगस्ट) आपल्या सर्व आमदारांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रिपादाचा राजीनामा दिला. नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाशी महागठबंधन करून पुन्हा एकदा सरकार स्थापणार आहेत.