वृत्तसंस्था, गुवाहाटी
ईशान्य भारतामधील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम इत्यादी राज्यांना मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या निरनिराळ्या घटनांमध्ये सर्व मिळून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आसाममधील पूरस्थिती सोमवारीही गंभीर असून आतापर्यंत विविध ठिकाणी पूर आणि भूस्खलन या घटनांमध्ये मृतांचा आकडा १०पर्यंत गेला आहे अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी वाढत असून १५ जिल्ह्यांमधील जवळपास चार लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. गुवाहाटीमधील हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास सर्वत्र मध्यम, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रह्मपुत्रा, धानसिरी, कोपिली, बराक, कुशियारा आणि कटखल या नद्या काही ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

दरम्यान, त्रिपुरामध्ये सोमवारी फारसा पाऊस पडला नाही. त्यामुळे काही नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात १० हजारांपेक्षा जास्त लोक मदत शिबिरांमध्ये राहत आहेत.

अरुणाचलमध्येही १० मृत्युमुखी

इटानगर : अरुणाचल प्रदेशातही सोमवारी संततधार होती. लोहित जिल्ह्यामध्ये पावसामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला असून राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १०पर्यंत पोहोचली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्याच्या आपत्कालीन प्रचालन केंद्राने दिलेल्या मागितीनुसार, २३ जिल्ह्यांमधील ९३८ लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच राज्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

मणिपूरमध्ये हजारो घरांचे नुकसान

इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून १९ हजारांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. गेल्या चार दिवसांमध्ये राज्यात निरनिराळ्या ठिकाणी भूस्खलनाच्या ४७ घटना घडल्या आहेत. राज्यभरात एकूण ३,३६५ घरांचे नुकसान झाले आहे. एकूण ३१ मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. इम्फाळ शहराचा बराचसा भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे.

तीन सैनिकांचा मृत्यू

गंगटोक : सिक्कीममधील छातेन येथे लष्करी छावणीवर भूस्खलन होऊन तीन सैनिकांचा मृत्यू झाला आणि सहा अन्य बेपत्ता झाले अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. मुसळधार पावसामुळे मांगन जिल्ह्यातील लाचेन गावाजवळ रविवारी संध्याकाळी सातच्या सुमाराला हे भूस्खलन झाले असे सांगण्यात आले. हवालदार लखविंदर सिंग, लान्स नायक मनिष ठाकूर आणि अभिषेक लखाडा अशी मृत सैनिकांची नावे आहेत. चार जणांची सुटका करण्यात यश आले असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपने २०१६मध्ये ‘पूरमुक्त आसाम’ची घोषणा केली होती. २०२२मध्ये अमित शहा यांनी त्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. तथाकथित ‘स्मार्ट सिटी’ असलेल्या गुवाहाटीची दृश्ये पाहता, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या डबल इंजिन सरकारने आसामचा कसा विश्वासघात केला आहे ते लक्षात येते. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</p>