उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे मुख्य सचिव ए. के. गुप्ता यांनी मुझफ्फरनगर येथील पुनर्वसन छावणीत मृत्यू झालेल्या मुलांबाबत अतिशय असंवेदनशील विधान केल्याने भाजप व काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अधिकाऱ्यांना शब्द जपून वापरण्याचा व कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अखिलेश यादव यांनी वार्ताहरांना सांगितले की, अधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांनी शब्द जपून वापरावेत. मग त्यांचे वक्तव्य सरकारच्या उणिवा किंवा पक्षाच्या कामगिरीबाबत असले तरी त्यांनी कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
मुख्यमंत्र्यांचे सचिव गुप्ता यांनी असे वक्तव्य केले होते की, थंडीमुळे कुणी मरत नाही तसे असते तर जगातील सर्वात थंड प्रदेश असलेल्या भागात लोक जिवंत राहू शकले नसते.
गुप्ता यांच्या विधानाचा निषेध करताना भाजपने म्हटले आहे की, प्रशासन असंवेदनशील झाले आहे हेच यातून दिसून येते.
भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, चूक मान्य करण्याऐवजी व त्यात दुरुस्ती करण्याऐवजी  उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी इतरांना दोष दिला आहे व अंसवेदनशील वक्तव्य केले आहे.
उत्तर प्रदेशचे काँग्रेस नेते अखिलेश प्रताप सिंग यांनी सांगितले की, जर थंडीमुळे न्यूमोनिया होत नाही तर मग कशामुळे होतो, उद्या ते गोळी मारल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला नाही तर रक्तस्रावाने झाला असेही म्हणतील. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मुख्य सचिव गुप्ता यांच्यावर टीका केली असून नोकरशहांना कमी कपडय़ानिशी थंडीत पाठवले पाहिजे. थंडीने माणसे मरत नाहीत म्हणणाऱ्यांना कपडय़ानिशी थंडीत पाठवा म्हणजे त्यांची भाषा कशी बदलते ते बघा असे ओमर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
काही वेळा  प्रश्नोत्तरांच्या वेळी भाषा नको तशी बदलते, तरी अधिकाऱ्यांनी बोलताना नियंत्रण ठेवले पाहिजे असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सांगितले.