निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने राजकारणी, पक्ष आणि उमेदवारांचे राजकीय भाषण असलेल्या काही पोस्ट्स हटवल्या आहेत. परंतु, निवडणूक आयोगाचा हा आदेश एक्सला मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एक्सने आम आदमी पार्टी, YSRCP, तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्या पोस्ट एक्सने हटवल्या आहेत. ग्लोबल गव्हर्नमेंट अफेअर्स टीमने पोस्ट केलेल्या लेखात एक्सने म्हटले, “भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, राजकारणी, राजकीय पक्ष आणि निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवार यांच्याकडून शेअर केलेले राजकीय भाषण असलेल्या पोस्टवर कारवाई करणे आवश्यक आहे. आदेशांचे पालन करून, आम्ही उर्वरित निवडणूक कालावधीसाठी या पोस्ट्स रोखून ठेवल्या आहेत; परंतु, आम्ही या कृतींशी असहमत आहोत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या पोस्ट्स आणि सर्वसाधारणपणे राजकीय भाषणापर्यंत विस्तारले पाहिजे असे आम्ही आमचं म्हणणं कायम ठेवतो.”

निवडणूक आयोगाने २ एप्रिल रोजी एक्सला आदेश दिले होते की वायएसआरसीपी आणि तेलगू देसम पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराची पोस्ट काढून टाका. या पोस्टमुळे आचारसंहितेचे भंग होत असून या पोस्टद्वारे एखाद्याच्या खासगी जीवनावर टीका करण्यात आली आहे. अशाचप्रकारचे आदेश आपच्या नेत्यांसाठीही देण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती. यावेळी सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाची देखरेख असणार आहे. या आचारसंहितेचं पालन होत नसल्याने निवडणूक आयोगाने या पोस्ट्स हटवण्याचे आदेश एक्सला दिले. पण एक्सला हे आदेश अमान्य आहेत. तरीही आदेशानुसार त्यांनी या पोस्ट्स हटवल्या आहेत.