भारतीय लष्कर लवकरच आपल्या ताफ्यात रशियन बनावटीच्या ४६४ अतिरिक्त टी-९० ‘भीष्म’ रणगाडयांचा समावेश करणार आहे. पाकिस्तानला लागून असणाऱ्या पश्चिम सीमेवर हे रणागडे तैनात करण्यात येणार आहेत. या रणगाडयांसाठी भारत १३,४४८ कोटी रुपये खर्च करणार असून २०२२ ते २०२६ दरम्यान हे रणगाडे लष्कराला मिळतील. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानलाही असेच टी-९० रणगाडे हवे आहेत. ३६० टी-९० रणगाडे खरेदी करण्यासंदर्भात पाकिस्तानची रशियाबरोबर चर्चा सुरु आहे. ४६४ टी-९० रणगाडयांच्या उत्पादनासाठी रशियाकडून आवश्यक परवाना मिळवायला मागच्या महिन्यात मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने मंजुरी दिली. अवादी हेवी व्हेईकल फॅक्टरीला भीष्म रणगाडयांच्या निर्मितीसाठी लवकरच मागणीपत्र मिळेल असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
भारतीय लष्कराकडे टी-९० प्रकारचे १,०७० रणगाडे आहेत. त्याशिवाय १२४ अर्जुन, २४०० टी-७२ रणगाडे आहेत. भारताने २००१ पासून ८,५२५ कोटी रुपये मोजून रशियाकडून ६५७ टी-९० रणगाडे आयात केले. त्यानंतर एचव्हीएफने रशियाकडून परवाना मिळवून भारतातच १ हजार रणगाडयांचे उत्पादन केले. उर्वरित ४६४ रणगाडयांच्या मागणीपत्रासंदर्भात काहीसा उशीर झाला आहे. या रणगाडयांमध्ये रात्री लढण्याचीही क्षमता असेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिले ६४ रणगाडे ३० ते ४१ महिन्यात लष्कराला मिळतील असे सूत्रांनी सांगितले. भारतीय सैन्य दल आपली युद्ध लढण्याची मशीनरी नव्याने तयार करत आहे.