Shashi Tharoor All Party Delegations to Colombia : भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान कोलंबियाने पाकिस्तानची बाजू घेतली होती. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तेथील मृतांप्रती कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. मात्र, कोलंबियाने आता त्यांचं ते विधान मागे घेतलं आहे. शशी थरूर यांचं शिष्टमंडळ तेथे गेल्यानंतर हा चमत्कार घडला आहे.
ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचावा म्हणून भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ अनेक देशांमध्ये पाठवले आहेत. त्यानुसार, शशी थरुर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ कोलंबियाला गेले होते. या भेटीदरम्यान, भारताने कोलंबियाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
“एकीकडे दहशतवादी आणि दुसरीकडे निष्पाप नागरिक यांच्यात कोणतीही समानता शक्य नाही. आपल्या देशावर हल्ला करणारे आणि स्वतःच्या देशाचे रक्षण करणारे यांच्यात कोणतीही समानता नाही आणि कोलंबियाच्या आधीच्या विधानाबद्दल आमची एकमेव निराशा म्हणजे त्यांनी या फरकाकडे दुर्लक्ष केले आहे,” असे थरूर यांनी चेंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या दुसऱ्या आयोगाचे अध्यक्ष खासदार अलेजांद्रो टोरो यांना भेटल्यानंतर सांगितले.
“तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते विधान मागे घेण्यात आले आहे हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि कोलंबियाच्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या सार्वभौमत्वासाठी, जगात शांततेसाठी आमच्यासोबत उभे राहण्यास दृढ आहात याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे…” असंही ते पुढे म्हणाले.
शिष्टमंडळाने दिलेल्या तपशीलवार माहितीमुळे विधान मागे
बोगोटा येथील कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा विलाविचेंसियो म्हणाल्या की, “आज आम्हाला मिळालेल्या स्पष्टीकरणामुळे आणि खरी परिस्थिती, संघर्ष आणि काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांबद्दल आमच्याकडे असलेल्या तपशीलवार माहितीमुळे आम्हाला खूप विश्वास आहे, आम्ही संवाद सुरू ठेवू शकतो…”
शिष्टमंडळात कोण कोण होतं?
शिष्टमंडळातील इतर सदस्यांमध्ये तेजस्वू सूर्या (भाजपा), भुवनेश्वर कलिता (भाजपा), मिलिंद देवरा (शिवसेना), शांभवी (लोजपा), जीएम हरीश बालयोगी (टीडीपी) आणि अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरणजीत सिंग संधू यांचा समावेश आहे.
कोलंबियाहून, हे शिष्टमंडळ ब्राझीलला जाईल. पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते अमेरिकेत असतील.